Headlines

पुण्यात नव्या बोगद्याने सिंहगड-सातारा रस्ता जोडणार, प्रवासाचा वेळ ५० मिनिटांवरून १० मिनिटांवर येणार| Maharashtra Times


Hingane to Dhanakawadi Tunnel: पुणेकरांना सध्या हिंगणे ते धनकवाडी प्रवास करताना स्वारगेट आणि कात्रजमधील वाहतूक कोंडीतून प्रवास करावा लागतो. पण ही समस्या आता दूर होणार. नव्या बोगद्यामुळे अवघ्या ५-१० मिनिटांत अंतर पार होणार आहे.

Hingane to Dhanakawadi Tunnel
म.टा. प्रतिनिधी, पुणे: नरवीर तानाजी मालुसरे रस्ता (सिंहगड रस्ता) आणि सातारा रस्ता यांना थेट जोडणाऱ्या हिंगणे-धनकवडी बोगदा प्रकल्पासाठी महापालिकेकडून निविदा प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार आहे. बोगद्याचा सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार झाला असून, त्यावर अंतिम हात फिरवण्यात येत आहे.

हिंगणे (सिंहगड रस्ता) ते धनकवडी (सातारा रस्ता) या मार्गादरम्यान तळजाई टेकडीमुळे वाहनांना थेट जा-ये करता येत नाही. त्यामुळे नागरिकांना स्वारगेट किंवा कात्रजमार्गे साडेसात ते नऊ किलोमीटरचा वळसा घालावा लागतो. या प्रवासासाठी साधारण ४० ते ५० मिनिटे लागतात. ही अडचण दूर करण्यासाठी महापालिकेने हिंगणे-तळजाई-धनकवडी बोगदा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. या बोगद्याचा डीपीआर तयार झाला आहे. उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, लवकरच निविदा प्रसिद्ध करणार असून, शक्य तितक्या लवकर हे काम सुरू करण्याची तयारीही महापालिकेने सुरू केली आहे.

Maharashtra TimesNew Pune City: नवी मुंबईच्या धर्तीवर ‘नवे पुणे’, पुरंदरमध्ये शहराचा नियोजित विस्तार करावा; नितीन गडकरींची सरकारला सूचना

दहा मिनिटांत प्रवास

या प्रकल्पात २.४ किलोमीटर लांबीचा मार्ग विकसित करण्यात येणार असून, त्यात ९३० मीटर लांबीचा चार-लेन (दोन अधिक दोन) बोगदा आणि दोन्ही बाजूंना ॲप्रोच रस्ते असतील. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हिंगणे ते धनकवडी हा प्रवास अवघ्या पाच ते दहा मिनिटांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रवासाचे अंतर, वेळ, इंधनाचा वापर आणि वाहतूक कोंडी कमी होईल, असा महापालिकेचा दावा आहे.

‘नेटवर्क’मधील दुवा

प्रस्तावित बोगदा हा इंटरमिजिएट रिंग रोड (आयआरआर) नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. शहराच्या पश्चिम आणि दक्षिण भागांतील वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. सिंहगड रस्ता, सातारा रस्ता परिसरातील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होईल. प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पर्यावरणीय मंजुरी, भूसंपादन आणि आर्थिक तरतूद या महत्त्वाच्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. या पार्श्वभूमीवर निविदा प्रक्रिया सुरू करण्याची तयारी महापालिकेने केली असून, त्यानंतर प्रकल्पाच्या पुढील टप्प्यांना प्रारंभ होणार आहे.

वाकडेवाडीत बांधणार उड्डाणपूल

वाकडेवाडी परिसरातील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने साखर संकुल येथून जुना पुणे-मुंबई महामार्गाकडे जाणारा उड्डाणपूल व ग्रेड सेपरेटर प्रस्तावित केला आहे. या उड्डाणपुलामुळे गणेशखिंड रस्त्यावरून थेट साखर संकुलमार्गे पुणे-मुंबई रस्त्यावर ये-जा करता येईल. या ७३.५२ कोटी रुपयांच्या खर्चाच्या उड्डाणपुलाला मान्यता देताना महापालिकेच्या स्थायी समितीने कलम ‘७२ ब’ अंतर्गत यासाठी पुढील वर्षांसाठीही आर्थिक दायित्व स्वीकारले आहे.

Maharashtra TimesDive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?

महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी सादर केलेल्या या प्रस्तावाला गुरुवारी स्थायी समितीने मान्यता दिली असून, आता हा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे सादर होईल. गणेशखिंड रस्त्याने पिंपरी-चिंचवडकडे जायचे झाल्यास वाहनचालकांना संचेती रुग्णालय, पाटील इस्टेट येथून कोंडीतून वाट काढत जावे लागते. साखर संकुलकडून जुन्या पुणे-मुंबई रस्त्याकडे जाताना महापालिकेने भुयारी मार्ग तयार केला. मात्र, यामधून केवळ दुचाकी; तसेच काही प्रमाणात हलकी वाहनेच ये-जा करू शकतात. त्यामुळे वाकडेवाडी परिसरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा