Headlines

Laxman hake enters politics announcement of obc janata party in Baramati; लक्ष्मण हाके अखेर राजकारणाच्या मैदानात; बारामतीतून पक्ष स्थापन करण्याची घोषणा, नावही ठरलं


दीपक पडकर, बारामती : ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर राज्य सरकार आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी स्वतंत्र ‘ओबीसी जनता पार्टी’ स्थापन करण्याची घोषणा केली. तसेच, भाजप हुकूमशाहीच्या पद्धतीने कारभार करत असून विरोधी आवाज दडपण्याचे काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

बारामती येथे माध्यमांशी संवाद साधताना हाके म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष सर्व प्रकारची आंदोलने दडपण्याचे काम करत आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, सरकार विरोधी भूमिका घेणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.” ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांकडे सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत त्यांनी ओबीसी महामंडळांना पुरेसा निधी दिला जात नसल्याचे सांगितले. तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांनाही विविध योजनांसाठी आवश्यक निधी उपलब्ध होत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना थेट जाब विचारत, “ओबीसी समाजाच्या महामंडळांना निधी कधी देणार? विद्यार्थ्यांसाठीच्या योजनांना आर्थिक तरतूद कधी करणार?” असा सवाल उपस्थित केला.

ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लढा अधिक तीव्र करण्यात येणार असून त्यासाठी ‘ओबीसी जनता पार्टी’च्या माध्यमातून राज्यभर संघटनात्मक बांधणी करण्यात येईल, असेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

काय असणार राजकीय पक्षाची ध्येयधोरणे?

नव्या राजकीय पक्षाची घोषणा करत असताना लक्ष्मण हाके यांनी पक्षाची वाटचाल कोणत्या पद्धतीने असणार, याबाबतही भाष्य केलं आहे. “कोणालातरी आमदार होण्यासाठी, मंत्री होण्यासाठी, कोणाला मुख्यमंत्री होण्यासाठी, कोणाला खासदार होण्यासाठी आमच्या पार्टीची घोषणा करण्यात आली नसून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नांवरती काम करण्यासाठी ओबीसी जनता पार्टी तयार करण्यात आली आहे. कोणाचे लाड पुरवण्यासाठी हा पक्ष अजिबात नाही,” असंही लक्ष्मण हाके म्हणाले.

दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी स्थापन केलेल्या ओबीसी जनता पार्टीला आगामी काळात राज्याच्या राजकारणात आपला प्रभाव पाडण्यात यश मिळतं का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.