Robin Uthappa Post News : वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी रॉबिन उथप्पाला IPLमधून ३.२ कोटी रुपये मिळाले. पण अचानक आलेल्या या पैशांनी आयुष्यात कोणत्या अडचणी निर्माण केल्या, याचा धक्कादायक अनुभव उथप्पाने स्वतः सांगितला आहे.

‘अख्ख्या पिढीने पाहिला नसेल एवढा पैसा…’
रॉबिन उथप्पाने नुकतीच लिंक्डइनवर एक पोस्ट शेअर केली असून, त्यामध्ये त्याने आपल्या तरुणपणीच्या संघर्षाला उजाळा दिला आहे. २००८ मध्ये उथप्पा अवघ्या २१ वर्षांचा होता, तेव्हा त्याला आयपीएलचे ३.२ कोटी रुपयांचे पहिले कॉन्ट्रॅक्ट मिळाले. यावर तो लिहितो, “एवढा पैसा आपण वयाच्या ३०-४० व्या वर्षीही कमवू, असा मी कधी विचारही केला नव्हता. एका झटक्यात माझ्या संपूर्ण पिढीच्या कमाईपेक्षा जास्त पैसा माझ्या हाती आला होता.” पण, एका मध्यमवर्गीय कुटुंबात अचानक एवढी संपत्ती आल्यावर लाखो विचार आणि प्रचंड गोंधळ निर्माण होतो. हा पैसा कसा हाताळावा, हे सांगायला त्यावेळी आजूबाजूला कुणीही नव्हतं, अशी खंत त्याने व्यक्त केली.
पैशांसोबत आलेले नातेवाईक आणि नैराश्याचा अंधार
पैसा आल्यावर अनेक लोक आणि नव्या समस्याही सोबत येतात. मध्यमवर्गातून अचानक श्रीमंत झाल्यावर कुटुंबाला आणि नातेवाईकांना ‘हा पैसा माझा आहे, तुमचा नाही’ हे समजावून सांगणे सोपे नसते. याच गोंधळात चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला जातो आणि चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक होते. या सगळ्याचा उथप्पाच्या मानसिकतेवर गंभीर परिणाम झाला. २००९ मध्ये तो क्लिनिकल डिप्रेशनचा सामना करत होता.
त्यावेळी दक्षिण आफ्रिकेतील एका हॉटेलच्या २३ व्या मजल्यावरील खिडकीच्या कट्ट्यावर बसून तो आत्महत्येचा विचार करत होता. उथप्पाच्या मते, “त्यावेळी मी कमावत असलेल्या पैशांचा माझ्यासाठी शून्य अर्थ उरला होता. पैसा तुम्हाला नैराश्यापासून वाचवू शकत नाही किंवा बिघडलेल्या कौटुंबिक समस्या सोडवू शकत नाही. पैशामुळे शांती आणि आत्मसन्मान विकत घेता येत नाही.”
रातोरात श्रीमंत होणाऱ्या तरुणांसाठी उथप्पाने महत्त्वाचे सल्ले दिले
पैसा आल्यावर तो कसा आणि कुठे गुंतवायचा यासाठी योग्य आर्थिक सल्लागारची मदत घ्या, ज्याचे आणि तुमचे हितसंबंध जुळत असतील. मानसिक शांतीसाठी अशा थेरपिस्ट किंवा कौन्सिलरची मदत घ्या, ज्याला तुमच्या पैशांशी काहीही देणंघेणं नसेल. अनुभवी लोकांच्या संपर्कात राहा. पैसा हाती येण्यापूर्वीच आपले सिद्धांत निश्चित करा. कुणाची, कशी आणि का मदत करायची आणि कुणाला स्पष्ट ‘नाही’ म्हणायचे, हे आधीच ठरवा. अचानक आलेल्या पैशामुळे आपण गोंधळलो आहोत, हे स्वीकारायला आणि मदत मागायला अजिबात संकोच करू नका. हा कोणताही चारित्र्यातील दोष नसून ती केवळ एक परिस्थिती आहे. “पैसा हा विजय नसून ती एक परीक्षाआहे. जे लोक पैसा येण्यापूर्वीच तो कसा हाताळायचा याचा पाया रचतात, तेच या परीक्षेत यशस्वी होतात,” हा अत्यंत महत्त्वाचा संदेश उथप्पाने आपल्या अनुभवातून दिला आहे.

