Pune News : आरोपी प्रियकर अथर्वच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर आईचे तरुणीशी बोलणे झाले. त्यावेळी अथर्व मला घरी घेऊन जाणार आहे, त्याला शारीरिक संबंध ठेवायचे आहेत आणि तो आपल्याला गोळी देणार असल्याचे तरुणीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे

एमपीएससी करताना प्रेमसंबंध
मयत तरुणीने बी.एस्सी. अॅग्रीचे शिक्षण पूर्ण केले होते. एमपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी ती ऑक्टोबर २०२५ पासून पुण्यात क्लास करीत होती. डिसेंबर २०२५ मध्ये तिचे अथर्वसोबत प्रेमसंबंध असल्याची माहिती तिच्या मैत्रिणीकडून आईला मिळाली. त्यानंतर आईने मुलीशी नियमित संपर्क ठेवला. ३० डिसेंबर रोजी आई व तिचा भाऊ पुण्याला जाऊन तिला बारामतीला घेऊन आले. त्यावेळी तिने अथर्वसोबत प्रेमसंबंध असून त्याच्याशी विवाह करण्याची इच्छा असल्याचे आईला सांगितले.
प्रियकराचा शरीरसंबंधांसाठी आग्रह
त्यानंतर दोन्ही कुटुंबीयांमध्ये विवाहाबाबत चर्चा झाली. १२ एप्रिल २०२६ रोजी दोन्ही कुटुंबीयांची भेट झाली आणि त्यांच्या संमतीने विवाह करण्याचे ठरले होते. त्यानंतर अथर्व आणि तरुणी एकमेकांना भेटत होते. तसेच त्यांचा नियमित फोनवर संपर्क होता. घटनेच्या सुमारे १५ ते २० दिवस आधी तरुणीच्या वागण्यात बदल झाल्याचे आईच्या लक्षात आले. ती शांत आणि गप्प राहत असल्याने आईने तिच्या मैत्रिणीकडे चौकशी केली. त्यावेळी अथर्व हा तरुणीकडे शारीरिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करीत असल्याचे तसेच तिला काही गोळ्या देत असल्याचे मैत्रिणीने सांगितल्याचा दावा आईने फिर्यादीत केला आहे.
६ ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास अथर्व कारमधून तरुणीला एमबीए प्रवेशाच्या कामासाठी टी.सी. कॉलेज येथे घेऊन गेला. दुपारी चार वाजताच्या सुमारास तरुणीने आईला प्रवेश फीबाबत मेसेज केला. तसेच अथर्वची आई व मावशी यांना सोडण्यासाठी जात असल्याचे सांगितले. आईने व्हिडिओ कॉल केला असता तरुणी अथर्वसोबत वाहनात असल्याचे दिसले. सायंकाळी सातच्या सुमारास आईने तरुणीला फोन केला; मात्र तिने फोन उचलला नाही.
गोळी देऊन शरीरसंबंध ठेवणार
त्यानंतर अथर्वच्या मोबाईलवर फोन केल्यानंतर आईचे तरुणीशी बोलणे झाले. त्यावेळी अथर्व तिला घरी घेऊन जाणार असल्याचे, त्याला तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचे असल्याचे आणि तो तिला गोळी देणार असल्याचे तरुणीने सांगितल्याचा दावा फिर्यादीत करण्यात आला आहे. आईने तिला अथर्वच्या घरी जाऊ नये व तातडीने घरी परतावे, असे सांगितले. रात्री नऊच्या सुमारास आईने मेसेज केल्यावर तरुणीने जेवण करीत असल्याचे उत्तर दिले. त्यानंतर तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. रात्री दहाच्या सुमारास आईने फोन केला असता अथर्वने फोन उचलला. तरुणीला चक्कर आल्याचे सांगून तिला घेऊन येत असल्याचे त्याने कळविले.
मुलीच्या मृत्यूवर आईला शंका
काही वेळाने अथर्व तरुणीला घेऊन आईच्या घरी आला. तिला प्रथम देवकाते हॉस्पिटल, त्यानंतर भोंईटे हॉस्पिटल आणि पुढे सिल्वर जुबली हॉस्पिटल येथे नेल्याचे त्याने सांगितले. रात्री सुमारे १०.२० वाजता आई सिल्वर जुबली हॉस्पिटलमध्ये पोहोचली. तेथे तरुणी स्ट्रेचरवर होती. तिचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी आईला समजले. या घटनेनंतर आईने मुलीच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करीत पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत्यूच्या कारणाचा तपास
तरुणीला कोणती गोळी अथवा औषध देण्यात आले होते का, दिले असल्यास ते नेमके कोणते होते, त्याचा तिच्या प्रकृतीवर काय परिणाम झाला आणि त्याचा मृत्यूशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय, रासायनिक, डिजिटल व तांत्रिक पुराव्यांच्या आधारे मृत्यूचे निश्चित कारण शोधले जात आहे. मृत्यूचे निश्चित कारण तसेच या घटनेत संबंधित व्यक्तीची नेमकी भूमिका याबाबत तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही अंतिम निष्कर्ष काढण्यात आलेला नाही. मयत तरुणीची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम व पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील करीत आहेत.

