ज्या वाटेत पुष्कळ डोंगर, किल्ले वगैरे आहेत असे समजून, किंवा पक्षी आपापल्या घरट्यांकडे परत जात आहेत तेव्हा संध्याकाळ झाली असे समजून जो आपल्याजवळ काहीएक ऐवज न घेता सडा जातो, त्यास चोर कसे लुटतील?’ किती मार्मिक दाखला माउलींनी दिला आहे तेराव्या अध्यायात. काय सांगण्यासाठी? ज्ञानी माणसाच्या विचार, दृष्टीविषयी. पुढे वय होईल हे जाणून तो आधीच तयारी करून ठेवतो, त्यामुळे अशा ज्ञानी व्यक्तीला वार्धक्याचा (चोरांचा) त्रास होत नाही.
तैसें वृद्धाप्य होय। आलेपण वाया जाय।
जे तो शतवृद्ध (शतायुषी) आहे। नेणों कैंचा॥
हा माणूस इतर अज्ञानी लोकांप्रमाणे ‘शंभर वर्षं आयुष्य आहे’ असे समजत नाही. म्हणून त्याला म्हातारपण आले असता, म्हातारपणच उलट परत जाते. त्यासाठी तो काय करतो? कान बधिर झाले नाहीत तोपर्यंत (आत्मज्ञानाच्या) सर्व गोष्टी ऐकून घेतो. शरीर स्वाधीन आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घेतो. दृष्टी, वाणी यांचाही उपयोग ईशस्मरणासाठी करतो.
आयुष्याच्या अखेरपर्यंत केवळ देहामध्ये गुंतून राहतो. अशा माणसाला वृद्धावस्था आली की मग तो हादरून जातो. हे टाळण्यासाठी काय करायला हवं, ते इथे माउली स्पष्ट करतात. हे सांगण्याची त्यांची पद्धतही किती प्रभावी आहे! म्हातारपणात एकेक अवयव कसा निकामी होत जातो, याचं चित्र ते उभं करतात, जसं की ‘पायांत पाय अडकतील, हात कापू लागतील. याप्रमाणे सर्व शरीराच्या चेष्टांचे (क्रियांचे) सोंग होईल. असं झाल्यावर जवळची माणसंदेखील याच्या मृत्यूची वाट पाहत राहतील.’ ज्ञानदेव वार्धक्याचं असं भेसूर चित्र रेखाटतात. त्यातून श्रोत्यांना जागृत करतात.
जनजागृतीचं हे कार्य करताना त्यांच्यातील वक्ता, कवी आणि गुरूही तितकाच प्रभावी आहे. एखादी गोष्ट करू नको असं सांगणं हा झाला उपदेश. उपदेश कुठे कोणाला आवडतो? म्हणून ज्ञानदेव तो अशा पद्धतीने करतात की ऐकणाऱ्यावर परिणाम व्हायलाच पाहिजे. हे झालं समुपदेशन ! ते तेव्हा उपयोगी होतं, आजही आहे, आणि उद्याही असणार!!

