Nepal Flood Emotional Story of Tourists Returning : तिमुरे येथे झालेल्या विध्वंसानंतर कुणी अडकले आहे का, याचा शनिवारीही शोध घेतला जात होता. मात्र, महाराष्ट्रातील बेपत्ता पर्यटकांबद्दल कोणतेही अधिकृत वृत्त कळले नसल्याचे सांगण्यात आले. या पुरामध्ये काही नागरिक डोंगरांवर चढले का, याचाही शोध घेतला जात आहे. मात्र विध्वंसानंतरची सध्याची तेथील स्थिती भयावह असल्याचेही बोलले जात आहे.

पर्यटकांनी सुटकेचा निश्वास टाकला
काठमांडूहून मुंबईत परतलेल्या दिनेश भोसले आणि त्यांच्या पत्नी तसेच स्मिता पवार यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. नेपाळमधील दुर्घटनेनंतर भोसले यांच्यासह चार जण आणि आणखी ३७ जणांचा गट शनिवारी मुंबईमध्ये परतला. ‘इमिग्रेशनसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची मागणी केली नसती तर आम्ही त्याच केंद्रावर असतो आणि कदाचित वाहून गेलो असतो. आमच्या समोरच एक मोठा समूह नेपाळमध्ये परतण्यासाठी इमिग्रेशन केंद्रावर आला होता आणि त्यांचा आता मागमूसरही लागत नसल्याचे या यात्रेकरूंनी सांगितले. हा खूप मोठा धक्का आहे. आपण वाचल्याचे समाधान आणि इतरांच्या अस्तित्वाचा अंदाज येत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांची झालेली स्थिती, अशा दोन्ही भावना एकाचवेळी अनुभवत आहोत’, असे त्यांनी सांगितले.
यात्रेकरूंच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू
अलिबागच्या चौल येथील जय गिरनारी शिवदत्त ट्रस्टच्या वतीने ३७ भक्तांसाठी नेपाळ, तिबेट येथे धार्मिक यात्रेचे आयोजन केले होते. १६ ते २९ ऑगस्ट असा त्यांचा प्रवासाचा कालावधी होता. २६ तारखेला हे सर्वजण सागा या ठिकाणी होते आणि त्याचदिवशी तिमुरे येथे पुराची घटना घडली. त्यामुळे हे यात्रेकरू वाचले. त्यानंतर भारतीय नागरिकांनी महाराष्ट्र सरकार, केंद्र सरकार तसेच भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. शुक्रवारी कोदारी सीमेवर चेकपोस्ट सुरू झाल्यानंतर शनिवारी इंडिगोच्या विमानाने त्यांना मुंबईत पोहोचवण्यात आले. मुंबई विमानतळावर पोहचल्यानंतर या यात्रेकरूंच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू होते. पुराचे धडकी भरवणारे व्हिडिओ समोर येत असताना आपले नातेवाईक सुखरूप घरी आल्याचा आनंद हा त्यांच्या नातेवाईकांनाही शब्दांमध्ये सांगता येत नव्हता.
…त्यामुळे जीव वाचला
‘काठमांडूला वेळेत पोहोचलो असतो, तर २६ तारखेला आम्ही तिमुरे गावात परतीच्या वाटेवर असतो आणि मग आम्हीही वाहून गेलो असतो… पण तसे झाले नाही’, अशा शब्दांत बोरिवली येथील पूनम आणि शमा साठे यांनी सुटकेचा निश्वास सोडला. यात्रा १५ ते २८ ऑगस्ट होती. मात्र, व्हिसा मिळायला एक दिवस उशीर झाल्याने पुढचा प्रवास एका दिवसाने लांबला आणि त्यामुळे जीव वाचला असे त्यांच्यासह इतर यात्रेकरूंनीही सांगितले. हुबळीच्या वर्षा करी यांनीही तिमुरे येथे २६ तारखेला पुढच्या प्रवासासाठी उपस्थित नव्हतो, याबद्दल परमेश्वराचे आभार मानले. ज्यांचे नातेवाईक त्यावेळी तिमुरे येथील इमिग्रेशन केंद्रावर होते, त्यांच्याबद्दल हळहळ व्यक्त करत त्यांच्याबद्दल लवकरच माहिती मिळू दे, अशी प्रार्थनाही केली.
प्रवास कसोटीचा
यात्रेसाठी जाताना चीन सरकारने व्हिसा, परमिट नाकारल्याने आमच्या नियोजित तारखांमध्ये थोडा बदल झाला आणि ते चांगल्यासाठीच झाले. २१ ऑगस्टला कैलास मानसरोवर यात्रेला सुरुवात झाली. तोपर्यंत सगळे वातावरण छान होते. मात्र नंतर पावसाला, हिमवर्षावाला सुरुवात झाली. आमच्यासोबत अनेक ज्येष्ठ होते. २०जण मुंबई, ठाण्याचे तर काही पुणे, कराडचे होते. २४ ते २६ ऑगस्टदरम्यान आमची परिक्रमा झाली. यामध्येही पावसामुळे अडथळे आले. मात्र, २६ ऑगस्टला परिक्रमा पूर्ण करून सागाला परतेपर्यंत आम्हाला तिमुरेला काय झाले याचा अंदाजही नव्हता. रस्ते वाहून गेल्याने आम्ही दोन दिवस सागा येथे थांबलो. त्यावेळी राज्य सरकार तसेच नेपाळ सरकारचे अधिकारी संपर्कात होते. शुक्रवारी सकाळी सागाहून निघून १६ तासांचा प्रवास करून काठमांडूला पोहोचलो आणि मग २९ ऑगस्टला नियोजित विमान पकडून मायदेशी परतलो. हा प्रवास परीक्षा घेणारा होता, मात्र देवावर श्रद्धा ठेवून सुखरूप आलो, असे शिवदत्त मंदिर ट्रस्टच्या कैलास मानसरोवर यात्रा आयोजक प्रमोद केणे यांनी सांगितले.

