Headlines

Mohan Sharma : 100 हून अधिक सिनेमे, आली वृद्धाश्रमात राहण्याची वेळ, उदरनिर्वाह होईना; सुप्रसिद्ध अभिनेत्याची CM कडे मदतीची मागणी


मुंबई – इंडस्ट्रीमध्ये असे अनेक कलाकार होऊन गेले आहेत, ज्यांनी त्यांच्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली, पण वृद्धापकाळात त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. अशीच एक दुःखद आणि धक्कादायक कहाणी आहे दाक्षिणात्य अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक मोहन शर्मा यांची. एकेकाळी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आपलं वर्चस्व असलेले मोहन शर्मा आता चेन्नईतील एका वृद्धाश्रमात विस्मृतीत आणि आजारपणात जीवन जगत आहेत. ज्या माणसानं अनेक चित्रपटांची निर्मिती केली आणि शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली, तो आता आपल्या वैद्यकीय खर्चासाठीसुद्धा इतरांवर अवलंबून आहे.

मोहन शर्मा केवळ एक अभिनेतेच नव्हते, तर एक फोटोग्राफरसुद्धा होते. आपल्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी जवळपास २० चित्रपटांची निर्मिती केली आणि १०० हून अधिक चित्रपटांमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम केलं. त्यांनी विविध भाषांमधील ५० हून अधिक चित्रपटांमध्ये व्यक्तिरेखाही साकारल्या. तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या चारही भाषांमध्ये चित्रपटांची निर्मिती करणारे ते पहिले निर्माते ठरले. त्यांनी ‘साऊथ इंडियन फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष म्हणूनही काम केलं. ‘चट्टाकारी’ (१९७४), ‘नेल्लो’ (१९७४), ‘सागर संगमम’ (१९८३), ‘सुलभ’ आणि ‘फ्रेंड्स’ (२००१) यांसारख्या अनेक यशस्वी आणि अविस्मरणीय चित्रपटांमध्ये त्यांनी आपली छाप पाडली.

मोहन शर्मा यांनी द्विभाषिक चित्रपट ‘ग्रामम/नम्मा ग्रामम’ची निर्मिती केली, तेव्हा त्यांची परिस्थिती खालावू लागली. या चित्रपटाला समीक्षकांची प्रशंसा मिळाली आणि अनेक राष्ट्रीय व राज्य पुरस्कारही मिळाले, परंतु हा सिनेमा व्यावसायिकदृष्ट्या पूर्णपणे अयशस्वी ठरला. चित्रपटाचा खर्च त्याच्या बजेटपेक्षा खूप जास्त झाला. अंदाजे १.२५ कोटींचं बजेट २ कोटींहून अधिक झालं. चित्रपटाचे थिएटरमधील प्रदर्शन, प्रसिद्धी आणि पोस्टर्सचा खर्च भागवण्यासाठी मोहन शर्मा यांना मोठं कर्ज घ्यावं लागलंं. हे कर्ज फेडण्यासाठी, त्यांना त्यांची संपत्ती विकावी लागली.

आर्थिक अडचणींसोबतच मोहन यांना आजरपण आलं. पायामध्ये गाठ झाल्यानं त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यामुळे ते चालू शकत नव्हते. इतकंच नाही, तर लिगामेंट फाटल्यामुळे झालेल्या उपचारांवर आणि शस्त्रक्रियेवर ४-५ लाख रुपये खर्च आला. आता मोहन यांना डायबीटीस झाला असून त्यांना दररोज इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यावं लागतं. केवळ औषधांवरच दरमहिना सुमारे ३५,००० रुपये खर्च येतो. आर्थिक परिस्थिती अधिक खालावल्यानंतर मोहन यांच्या मित्रांनी त्यांना वृद्धाश्रमात राहण्याचा सल्ला दिला.

मोहन शर्मा यांचं वैयक्तिक आयुष्यही चढ-उतारांनी भरलेलं आहे. त्यांनी १९७५ मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री लक्ष्मीसोबत लग्न केलं, पण १९८० मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. नंतर त्यांनी शांती नावाच्या महिलेशी लग्न केलं. पत्नी आणि मेहुण्यामधील वादामुळे त्यांना पत्नीच्या नावावर असलेल्या अपार्टमेंटमधून बाहेर पडावं लागलं. मेहुण्याच्या दबावामुळे त्यांना घटस्फोटाची नोटीससुद्धा पाठवण्यात आली. मोहन यांना एक मुलगा असून जो जर्मनीमध्ये राहतो. तो वडिलांना आर्थिक मदत करू शकत नाही. मोहन यांचा मुलगा त्यांची काळजी घेण्यासाठी भारतात येण्यास तयार होता, मात्र लेकाच्या करिअरसाठी त्यांनी नकार दिला.

संकटाच्या काळात रजनीकांत देवदूत ठरले

रजनीकांत यांनी मोहन यांना आर्थिक मदत केली. मोहन शर्मा म्हणाले, ‘रजनीकांत माझ्या आयुष्यात देवासारखे आले. त्यांनी माझा स्वाभिमान वाचवला. जगासाठी ते सुपरस्टार असतील, पण माझ्यासाठी ते साक्षात देव आहेत.’

मुख्यमंत्री विजय यांच्याकडून मदतीची आशा

सध्या नातेवाईक आणि मित्रांकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या आर्थिक मदतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या मोहन शर्मा यांनी आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांच्या टीमकडे मदतीसाठी आवाहन केलं आहे. मोहन शर्मा म्हणाले की, ते विजय यांना गेल्या २५ वर्षांपासून ओळखतात आणि त्यांच्या चित्रपटांमध्ये कामही केलं आहे.