Headlines

अजिंक्य रहाणेला का वाटतेय टीम इंडियाची चिंता? भारतीय क्रिकेटमध्ये काय गंडतंय, निवृत्तीनंतर पहिल्यांदाच थेट बोलला


Ajinkya Rahane News : भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी म्हणावी तशी चांगली नाही. गेल्या दोन वर्षांमध्ये भारताने घरच्या मैदानांवर खेळतानाही पराभवाचा सामना केला आहे. संघाच्या कामगिरीवर आता नुकतीच क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेल्या अजिंक्य रहाणेने चिंता व्यक्त केली आहे. तो नेमकं काय म्हणाला?

Ajinkya Rahane Podcast
मुंबई : भारताचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. निवृत्तीनंतर प्रथमच एका पॉडकास्टमध्ये बोलताना त्याने भारतीय कसोटी संघाच्या सध्याच्या स्थितीबाबत चिंता व्यक्त केली. कसोटी क्रिकेटमध्ये मजबूत मानसिकता, अनुभवी खेळाडू आणि संयम यांची कमतरता जाणवत असल्याचं रहाणेने सांगितलं. गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक झाल्यानंतर भारताला मायदेशात सलग दोन कसोटी मालिकांमध्ये क्लीन स्वीपचा सामना करावा लागल्याच्या पार्श्वभूमीवर त्याचं हे वक्तव्य चर्चेत आलं आहे.

‘भारतीय कसोटी क्रिकेटची चिंता वाटते’

‘स्टिक टू क्रिकेट’ पॉडकास्टमध्ये रहाणे म्हणाला, “मी गेली दोन वर्षे कसोटी क्रिकेट खेळलेलो नाही. त्यामुळे घरी बसून भारतीय संघाचे सामने पाहत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर मनोबल मजबूत पाहिजे आणि त्याचबरोबर स्पर्धात्मक क्रिकेटचा अनुभव आवश्यक असतो.”

तो पुढे म्हणाला, “मला कसोटी क्रिकेटची चिंता वाटते. गेल्या दोन-तीन वर्षांत जे घडलं, ते पाहता वरिष्ठ खेळाडूंना संघात टिकवून ठेवणं आणि त्यांचा आदर करणं खूप महत्त्वाचं आहे. भारतात अनेक वरिष्ठ खेळाडूंनी एकाचवेळी निवृत्ती घेतल्यामुळे संघासमोर मोठं आव्हान निर्माण झालं आहे.”

Maharashtra TimesRohit Sharma News : मला ड्रॉप करायचंय तर करा! लॉर्ड्सवरील शतकापूर्वी रोहित आणि निवडकर्त्यांमध्ये काय चर्चा? माजी क्रिकेटरने आतल्या गोष्टी फोडल्या

संयम कमी होत चालल्याची खंत

रहाणेच्या मते, आजच्या क्रिकेटमध्ये संयम कमी होत चालला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकून राहणं आणि कठीण सत्रांमधून संघाला बाहेर काढणं हे मोठं कौशल्य आहे. मात्र, सध्याच्या पिढीत ही गोष्ट कमी प्रमाणात दिसत असल्याचं त्याने सांगितलं.

वरिष्ठ खेळाडूंची गरज अधोरेखित

भारतीय संघात आता १०० कसोटी सामने खेळलेला एकही क्रिकेटपटू नाही. रवींद्र जडेजा आणि केएल राहुल हेच सर्वाधिक अनुभवी खेळाडू आहेत. यावर रहाणे म्हणाला, “कसोटी क्रिकेटमध्ये ७ ते ८ अनुभवी आणि २ ते ३ युवा खेळाडूंचं योग्य मिश्रण असणं गरजेचं आहे. सध्या संघात बहुतेक खेळाडू नवीन आहेत. अनुभवी क्रिकेटपटूंची कमतरता स्पष्टपणे जाणवत आहे.”

Maharashtra TimesIshan Kishan News : क्रिकेटर इशान किशन RBI बँकेत मोठ्या पदावर कार्यरत; सरकारी नोकरीची स्टोरी अन् पगाराचा आकडा माहितीये का?

मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत बोलताना रहाणे म्हणाला की, “मी त्यांच्यासोबत खेळलो आहे. मात्र ते प्रशिक्षक असताना त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी मला मिळाली नाही.”