संत एकनाथांनी ‘सगुण निर्गुण’ हा भाव स्पष्ट करताना म्हटलेय ‘बीजे व्यापिलें वृक्षासी। तैसे निर्गुणें व्यापिलें सगुणासी’ बीज अवस्थेत वृक्ष निर्गुण निराकार असतो. बीजावस्था संपल्यावर वृक्षाचा जो विस्तार होतो त्याचा आकार चित्रविचित्र असू शकतो. मूलतः कोणतीही व्यक्ती वाईट अथवा चांगली नसते. तिला आकार देणारे घटक परिणामकर्ते असतात. व्यक्तीचे अंतःकरण शुद्ध-अशुद्ध घडविण्यात बाह्य संस्कार कारणीभूत ठरतात.
सत्य, प्रेम,चारित्र्य, निःस्वार्थता, प्रामाणिकपणा, विवेक, निरवैरता, शब्दप्रामाण्य, परोपकार, सदाचार असा मूल्यवर्धित विचार कौटुंबिक जीवनव्यवहारात प्रमाणभूत असेल तर अशा समूहातील व्यक्तींकडून पुढे वाईट मार्ग निवडणे दुरापास्तच. परंतु कौटुंबिक स्तरावरच या मूल्यांची वानवा असेल तर द्वेष, मत्सर, वैरत्व, अहंकार, मोह, माया, स्वार्थ या पीडा व्यक्तींना बाधीत करतात. यावर मात करण्यासाठी ‘विचार, विवेक आणि शब्दप्रामाण्य’ हे सूत्र संतानी दिले आहे. सामान्य माणूस आणि संत यांच्यातील फरक असा की सामान्य माणूस स्वार्थाच्या अपेक्षांचे ओझे वाहतो, तर संत मानवी कल्याणाचा मूल्यनिष्ठ विचाराने आयुष्य जगतात. सत्य, सदाचार, परोपकार आणि विवेक यांस जीवनव्यवहारात प्राधान्य देतात.
मानवी जगणे नितळ करायचे असेल तर निरपेक्ष जगता यावे ही पूर्वअट ठरते. अपेक्षा, स्वार्थाचे ओझे घेऊन दबलेली माणसे इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. संतत्वाची पूर्वअट माणसाच्या कथनी आणि करणीत अंतर असू नये. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाउले’. परंतु आज याबाबत मोठी विसंगती दिसून येते. यासाठी संताचा भर आचरण शुद्धतेवर होता. या आचरण शुद्धतेसाठी हवे ते शब्दप्रामाण्य.
जैसा मुख तै नीकसे, तैसी चाले।
पार ब्रह्मा नेडा है, पल मै करे निहाल॥
कबीरांनी आचरण धर्माचे महत्त्व नितांत सुंदर स्पष्ट केले. समदृष्टीने भवतालच्या मानवी संबंधांकडे पाहता येणे, जवळचा-दूरचा, आपला-परका हा भाव ठायी न ठेवता मानवजातीच्या कल्याणाचा विचार पुढे घेवून जाणे हाच संतत्वाकडे जाण्याचा सोपा मार्ग आहे!

