![]()
काही वर्षांपूर्वी मांझी-माउंटन मॅन नावाचा चित्रपट आला होता. या चित्रपटात डोंगर तोडून रस्ता बनवणाऱ्या दशरथ मांझी यांची कथा आहे. ज्यावेळी मांझी, हाताने डोंगर तोडायला निघाले होते त्यावेळी लोक त्यांची गंमत करत होते. पण एक दिवस त्या डोंगरातून रस्ता जातो.. यात एक डायलॉग आहे… जब तक तोडेंगे नहीं तबतक छोडेंगे नहीं..अशीच स्थिती बिहारच्या राजधानी पाटणा येथील बांकीपूर विधानसभा निवडणुकीत दिसून आली. बिहारच्या राजधानी पाटणा येथील बांकीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने अवघ्या देशाचे लक्ष वेधून घेतले. निवडणूक व्यूहरचनाकार ते राजकारणी असा प्रवास केलेल्या प्रशांत किशोर यांनी स्वतः रणांगणात उतरून जनसुराज पक्षाच्या तिकिटावर भाजपच्या बालेकिल्ल्याला जोरदार आव्हान दिले व भाजपचा बालेकिल्ला भेदला. फक्त दोनच राऊंडमध्ये भाजपला आघाडी 1995 पासून या मतदारसंघात भाजपचा पराभव झालेला नाही आणि विद्यमान भाजप राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी राज्यसभेवर निवड झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. मतमोजणीच्या सुरुवातीच्या फेऱ्यांतील कलानुसार किशोर यांनी भाजप उमेदवार नीरज कुमार सिन्हा यांच्यावर सातत्याने आघाडी कायम राखली आहे. मतमोजणीच्या सर्व 31 राऊंड पैकी फक्त दोनच राऊंडमध्ये भाजपला आघाडी मिळाली आणि हे आश्चर्यचकित करणार आहे. प्रशांत किशोर यांनी फक्त पोट-निवडणूक नाही जिंकली तर बिहारच्या राजकारणात एक नवीन इतिहास लिहला असे म्हंटले तर वावगं ठरणार नाही. नॅरेटिव्हची लढाई किशोर यांनी ही निवडणूक अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लढवली. भाजपला का पराभूत केले पाहिजे, याचे ठोस आणि सोपे कारण त्यांनी सातत्याने मतदारांसमोर मांडले. निवडणुकीच्या आधी संपूर्ण बिहारमध्ये पदयात्रा काढून त्यांनी राज्याच्या शैक्षणिक व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवले आणि बिहार प्रगत झाला पाहिजे, हा एकच संदेश सर्वत्र पोहोचवला. विरोधी पक्षांसाठी हा पहिला धडा आहे. निव्वळ सत्ताधाऱ्यांवर टीका करून भागत नाही, तर मतदारांना भावणारा, स्पष्ट आणि सातत्याने पुनरुच्चारित होणारा नॅरेटिव्ह उभा करावा लागतो. हिंदुत्व काउंटर हिंदुत्व हा भाजपचा मुख्य नॅरेटिव्ह राहिला आहे आणि याच नॅरेटिव्हला प्रशांत किशोर यांनी छेद दिला. अयोध्यातील चंदा चोरी, उज्जैन येथील जमीन चोरी हे आरोप भाजपवर संपूर्ण देशभरात होत होते आणि त्यामुळे मूळ भाजपचे लोकही सरकारवर नाराज होते. तसेच 4 जुलै रोजी लखनऊ येथे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बांकीपूरचे माजी आमदार नितीन नबीन यांच्या रॅलीत एक माणसाला भगवान हनुमानच्या रूपात भाजपचा झेंडा घेऊन नाचायला लावले. याचे मोठे भांडवल प्रशांत किशोर यांनी केले आणि संपूर्ण हिंदुत्वाचे नॅरेटिव्ह डिफिट केले. युवकांना जोडण्याची किमया बिहार लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसंदर्भात किशोर यांनी केलेल्या आंदोलनाचा त्यांना मोठा राजकीय फायदा झाला. तसेच जंतर मंतर येथील NEET विरोधातील आंदोलनाचा व केंद्र सरकारने युवकांवर केलेल्या लाठीचार्जमुळे तरुणांचा रोष हा भाजप विरोधात होता. तसेच प्रशांत किशोर यांनी शिक्षणावर सातत्याने बोलून प्रत्येक बिहारीने चांगलं शिक्षण घेतले पाहिजे हा मुद्दा सतत लावून धरला. याचा फायदा असा झाला की, पोट-निवडणुकीत अंदाजे 70 टक्के युवा मतदार त्यांच्या बाजूने झुकल्याचे चित्र दिसले. शिक्षण आणि रोजगाराचा मुद्दा हा तरुणांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, हे ओळखून त्यावर सातत्याने भाष्य केल्यास तरुण मतदार जोडता येतो, हे विरोधी पक्षांनी लक्षात घेण्यासारखे आहे. जातीपलीकडे जाणारा जनाधार बिहारच्या राजकारणात जात हा निर्णायक घटक मानला जातो. मात्र या निवडणुकीत हे समीकरण मोडीत निघाल्याचे दिसले. सर्वच सामाजिक स्तरांतील मतदारांनी किशोर यांना पसंती दिल्याचे चित्र समोर आले. जातीय समीकरणांच्या पलीकडे जाऊन विकास आणि सुशासनाच्या मुद्द्यावर व्यापक जनाधार उभा करता येतो, हा संदेश यातून मिळतो. प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचा पुरेपूर वापर भाजपने सुरुवातीपासूनच किशोर यांच्याच नॅरेटिव्हवर खेळण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने संपूर्ण खेळाचे चित्रच पालटले. यातच भाजपच्या स्थानिक नेत्यांनी केलेले बेजबाबदार वक्तव्य- “कुत्रा-मांजरही उभा राहिला तरी तो निवडून येईल” किशोर यांच्या हाती आयते कोलीत देऊन गेले. त्यांनी हा मुद्दा वारंवार उचलून धरत “तुमच्या मतांची भाजपला किंमतच नाही” असा संदेश मतदारांपर्यंत पोहोचवला. सत्ताधाऱ्यांच्या प्रत्येक चुकीच्या वक्तव्याचे भांडवल कसे करावे, याचे हे उत्तम उदाहरण आहे. तळागाळातील सातत्यपूर्ण प्रचार जनसुराज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रोज एक नवा मुद्दा घेऊन त्यावर व्हिडिओच्या माध्यमातून जनजागृती केली. एकाच वेळी अनेक मुद्द्यांवर बोलण्याऐवजी रोज एक ठोस मुद्दा मतदारांपर्यंत पोहोचवण्याची ही रणनीती प्रभावी ठरली. सोशल मीडियाचा नियोजनबद्ध आणि सातत्यपूर्ण वापर हा आजच्या निवडणुकीतील अपरिहार्य घटक बनला आहे, हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित होते. बूथ पातळीवरील संघटन केवळ मोठ्या सभा आणि प्रसारमाध्यमांतील चर्चा पुरेशी नसते; प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी बूथ पातळीवरील यंत्रणा किती सक्षम आहे, यावरही निकाल अवलंबून असतो. मतदानाच्या दिवशी बदलाची इच्छा असलेला मतदार आणि नाराज भाजप कार्यकर्ता मतदानापासून दूर राहिल्याचे बोलले जात आहे, तर दुसरीकडे जनसुराजने बूथ पातळीवर चांगली लढत दिली. भाजपच्या अत्यंत मजबूत मानल्या जाणाऱ्या बूथवरही किशोर यांनी जवळपास निम्मी मते मिळवत भाजपला रोखून धरले. संघटनात्मक बांधणी हा नॅरेटिव्हइतकाच महत्त्वाचा घटक असतो, याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. राष्ट्रीय संदेशाचे महत्त्व भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्याच मतदारसंघात पक्षाला रोखणे किंवा पराभूत करणे, ही बाबा त्या मतदारसंघापुरता मर्यादित राहणारी नाही. त्यातून संपूर्ण देशात एक ठाम राजकीय संदेश जातो, ज्याचा फायदा इतर विरोधी पक्षांनाही होऊ शकतो. प्रतीकात्मक लढाया आक्रमकपणे लढवल्यास त्याचा परिणाम स्थानिक सीमा ओलांडून राष्ट्रीय पातळीवर जाणवतो, हे या निवडणुकीने पुन्हा सिद्ध केले आहे. निष्कर्ष बांकीपूरची ही लढाई सांगतो की, एक सुस्पष्ट नॅरेटिव्ह, तरुणांशी भावनिक नाते, जातिनिरपेक्ष व्यापक जनाधार, प्रतिस्पर्ध्याच्या चुकांचा वेळीच वापर, सातत्यपूर्ण डिजिटल प्रचार आणि भक्कम बूथ व्यवस्थापन, या सर्वांची सांगड घातल्यास अगदी बालेकिल्ल्यातही सत्ताधाऱ्यांना घाम फोडता येतो. देशातील विरोधी पक्षांनी निवडणूक कशी लढवावी, याचे एक ठोस उदाहरण या निमित्ताने समोर आले आहे. यातून तरुणांना आपल्या बाजूने वळवण्याची आणि बदलाची गरज भासवण्याची कलाही अधोरेखित होते जी येत्या काळातील प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे. (लेखक राजकीय विश्लेषक व सल्लागार आहेत.)
Source link
विरोधी पक्षांनी प्रशांत किशोर यांच्याकडून काय शिकावे?:बिहारच्या बांकीपूर निवडणुकीत नॅरेटिव्हची लढाई कशी जिंकली?, वाचा…
