Headlines

'दुपारी 2 वाजता दाखवून देतो…':काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा बिश्नोई गँगची धमकी; फोन रेकॉर्डिंग व्हायरल, विधानसभेत गदारोळ




पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना पुन्हा एकदा बिश्नोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास आलेल्या धमकीच्या फोनमध्ये खंडणीची मागणी करण्यात आली असून, पैसे न दिल्यास हत्या करण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. ‘आमचे ऐकले नाही तर दुपारी 2 वाजता दाखवून देतो’ मिळालेल्या माहितीनुसार, धमकीचा फोन थेट काँग्रेसचे नगरसेवक आकाश कावडे यांना करण्यात आला. फोनवरील व्यक्तीने स्वतःला बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचे सांगत, “साजिद पठाण यांनी आमचे ऐकले नाही, तर 2 जुलै रोजी दुपारी 2 वाजता काय होते ते दाखवून देतो,” अशी धमकी दिल्याचे सांगितले जात आहे. या संभाषणाचे कथित ऑडिओ रेकॉर्डिंगही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, त्याची सत्यता तपासण्याचे काम पोलिस यंत्रणा करत आहे. विधानसभेतही गाजला मुद्दा विशेष म्हणजे, साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी येण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वीही त्यांना अशाच प्रकारची धमकी मिळाली होती. दोन दिवसांपूर्वी विधानसभेत काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी लक्षवेधीद्वारे हा गंभीर मुद्दा उपस्थित करत, आमदारांना गुन्हेगारी टोळ्यांकडून धमक्या मिळत असल्याबद्दल सरकारचे लक्ष वेधले होते. त्यानंतर काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनीही सभागृहात “बिश्नोई गँग फोन करून आमदारांना धमक्या देत आहे,” असा गंभीर दावा केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री शंभूराज देसाई यांनी सरकार या प्रकरणाची सखोल चौकशी करेल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले होते. सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर दरम्यान, धमकीचा कथित ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर आमदारांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू असताना लोकप्रतिनिधींनाच अशा प्रकारच्या धमक्या मिळत असल्याने सुरक्षा यंत्रणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असून, व्हायरल झालेल्या ऑडिओची फॉरेन्सिक पडताळणीही केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. हेही वाचा.. सुरक्षेवरून विधानसभेत राडा: बिश्नोई गँगच्या धमकीवरून वडेट्टीवार संतापले; म्हणाले- रोहित शेट्टीला 25 गार्ड, मग आमदाराला का नाही? राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज दोन अत्यंत संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. काँग्रेसचे आमदार साजिद पठाण यांना कुख्यात ‘बिश्नोई गँग’कडून पुन्हा एकदा धमकी आल्याचा धक्कादायक प्रकार काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सभागृहात मांडला. यासोबतच, लातूरमधील शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर स्थगन प्रस्ताव नाकारण्यात आल्याने संतप्त झालेल्या विरोधकांनी थेट सभात्याग केला. वडेट्टीवार यांनी आक्रमक पवित्रा घेत विचारले, “जर चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांना २५ सुरक्षारक्षक दिले जाऊ शकतात, तर जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या काँग्रेसच्या आमदारांना तशीच सुरक्षा का दिली जात नाही?” या प्रकरणाची सखोल चौकशी करून पठाण यांना तत्काळ अतिरिक्त सुरक्षा देण्याची मागणी त्यांनी केली. सविस्तर वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत