म्हापसा : बार्देश तालुक्यातील कोलवाळ गावात गेल्या काही महिन्यांपासून कथित अवाजवी आणि अनियमित वीज बिले येत असल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली आहे. काही ग्राहकांना दुप्पट-तिप्पट रकमेची बिले तर काहींना तब्बल १७ हजार रुपयांपर्यंतची वीज बिले आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.
या समस्येच्या निषेधार्थ कोलवाळ ग्रामस्थांनी सोमवारी म्हापसा येथील वीज खात्याच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढला. सरपंच रितेश वारखंडकर आणि माजी सरपंच नितीन कांदोळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले.
ग्रामस्थांनी वीज खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. अचानक वाढलेल्या वीज बिलांबाबत स्पष्टीकरण देण्याची मागणी करत, मीटर रीडिंग आणि बिलांची फेरपडताळणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
गेल्या काही महिन्यांपासून नियमित वीज वापर असूनही अपेक्षेपेक्षा जास्त रकमेची बिले येत असल्याने ग्राहक आर्थिक अडचणीत सापडल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे संबंधित वीज मीटरची तपासणी करून बिलांमधील तफावत दूर करावी आणि ग्राहकांना योग्य बिल आकारावे, अशी मागणी करण्यात आली.
वीज बिलांच्या या प्रश्नावर वीज खात्याने तातडीने कार्यवाही करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा, अशी मागणी मोर्चेकऱ्यांनी केली आहे.
