![]()
2018 मधील टॉयलेट क्लीनरची प्रसिद्ध जाहिरात आठवा. बॉलीवूड स्टार अक्षय कुमार आपल्या टीव्ही स्क्रीनवर यायचा. टॉयलेट स्वच्छ कसे ठेवावे हे तो सांगायचा. एका चाहत्याच्या घरी जाऊन स्वतःची जाहिरात असलेले उत्पादन घ्यायला लावल्यानंतर ते एक आश्वासन द्यायचा- ‘यांना तर पटले. पुढचे घर तुमचे!’ आपल्यापैकी कित्येकांना वाटले असेल की याच बहाण्याने का होईना अक्षयने आपल्या घरी यावे. पण तो कधीच आला नाही. असो, गंमत बाजूला ठेवूया. भारतात टॉयलेट साफ करणाऱ्या उत्पादनांची जाहिरात करणे ही नेहमीच विचित्र बाब राहिली. त्यांना एक उपयुक्त उत्पादन विकायचे असते, त्याचा प्रत्यक्ष पुरावा दाखवायचा असतो आणि तो संपूर्ण कुटुंबाने एकत्र बसून पाहावा याची काळजीही घ्यायची असते. टॉयलेट क्लीनर ‘हार्पिक’ बनवणारी कंपनी ‘रेकिट’ने प्रेक्षकांना न दुखावता, बाथरूमला मुख्य प्रवाहातील पडद्यावर आणण्यात यश मिळवले. 2018 मध्ये हार्पिकने स्वच्छतेच्या मोहिमेसाठी अक्षय कुमारला ब्रँड ॲम्बेसेडर केले. कंपनीने त्याला आपले ‘हर घर स्वच्छ’ मिशनशी आणि स्वच्छतेच्या सवयी बदलण्याच्या संदेशाशी जोडले. याच 2018 मध्ये सर्बियाचा मॉडेल लाझार जानकोव्हिच मॉडेलिंग आणि कमर्शियल करारासाठी भारतात आला. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयी बदलतील म्हणून त्याने तब्बल सहा वर्षे वाट पाहिली. पण तसे काही झाले नाही. 20 राज्यांच्या प्रवासात त्याने एक मोठी समस्या पाहिली. त्याकडे दुर्लक्ष करणे कठीण होते- रस्त्यावर पसरलेला कचरा. 2024 मध्ये वयाच्या 31 व्या वर्षी लाझारने ‘4CleanIndia’ मोहीम सुरू केली. तो स्वतःसोबत कचऱ्याच्या पिशव्या ठेवायचा. ऋषिकेशपासून ते तामिळनाडू व सिक्कीमपर्यंत प्रत्येक ठिकाणी छोटी-छोटी सफाई करायचा. एखाद्या जागेची सफाई करून त्याचा व्हिडिओ पोस्ट करणे पुरेसे नाही हे त्याला लवकरच समजले. त्याने आपल्या प्रयत्नांना सोशल मीडिया चॅलेंजमध्ये बदलले आणि लोकांना आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागला. आता त्याच्या पेजशी सुमारे 1.5 लाख लोक जोडले गेले आहेत आणि ते स्वतःच्या सफाई मोहिमांचे फोटो शेअर करत आहेत. बेंगळुरूमध्ये त्याने जयनगर, जेपीनगर, चर्च स्ट्रीट आणि कब्बन पार्कच्या आसपासच्या अशा 10 ठिकाणांची सफाई केली. गुरुग्रामच्या सेक्टर 55 मध्ये लाझारला रस्ते साफ करताना पाहून तेथील रहिवाशांनी परिसराच्या देखभालीसाठी व्हॉट्सॲप ग्रुप बनवले. ते म्हणतात, ‘एका परदेशी व्यक्तीला आपले रस्ते साफ करताना पाहून आम्हाला लाज वाटली.’ लाझारची पद्धत काही नवीन नाही. राजस्थानमधील एका सरकारी कर्मचारी प्रमिला यांनी हातात झाडू घेऊन गावकऱ्यांना मदतीला घेतले आणि आपल्या गावात टॉयलेटची सुविधा 25% वरून 100% वर नेली. राजस्थानच्या अलवरमध्ये राजेंद्र सिंह यांनी गावकऱ्यांच्या मदतीने पारंपरिक जलसंधारण संस्थांना नवसंजीवनी दिली. त्यामुळे दुष्काळग्रस्त भागात नद्या आणि भूजल परत आणण्यास मदत झाली. चंद्रपूर जिल्ह्यातील सातारा तुकूमचे रहिवासी तर पालिकेच्या कर्मचाऱ्यांशिवाय आपले गाव स्वच्छ ठेवतात. ते आपल्या गल्लीची सामूहिक जबाबदारी घेतात. हा परिसर स्वतःची अभूतपूर्व स्वच्छता, समुदाय शिस्त आणि जंगल संवर्धनाच्या प्रयत्नांसाठी प्रसिद्ध आहे. लाझारबद्दल मला आवडलेली गोष्ट म्हणजे स्वच्छता मोहिमांमध्ये ‘ज्ञानापेक्षा’ भावनेची जास्त गरज असते असे त्याला वाटते. सफाईला एखादे भाषण बनवण्याऐवजी, एक आनंददायी उपक्रम बनवावे, कदाचित एखाद्या ‘डांस’सारखे; जेणेकरून लोकांना त्यात सहभागी व्हावेसे वाटेल, असा त्याचा सल्ला आहे. या विचारासह तो फक्त रस्ते साफ करत नाहीये, तर लोकांचा सार्वजनिक ठिकाणांकडे बघण्याचा दृष्टिकोनच तो बदलत आहे.आपण भारतीय स्वच्छतेचे महत्त्व चांगल्या प्रकारे समजतो. आपण आपली घरे नक्कीच स्वच्छ ठेवतो. आपल्याला फक्त याच मानसिकतेने घराच्या थोडे बाहेर पाऊल टाकायचे आहे, जेणेकरून आपले शहरही स्वच्छ राहील. फंडा हा आहे की, एखादी ‘दुसरी’ व्यक्ती बदल घडवण्याचा निर्णय घेते तेव्हा आपल्या आसपासचा परिसर बदलत नाही. पण आपण हा परिसर ‘आपला’ मानतो तेव्हाच तो सुंदर बनतो.
Source link
एन. रघुरामन यांचा कॉलम:कोणालाही लाज वाटू न देता ओळखीची जाणीव करून दिल्यास चमत्कार घडतो
