सावंतवाडी प्रतिनिधी : मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप आणि इन्सुली-खामदेव नाका येथील फ्लायओव्हर पूल अद्याप वाहतुकीसाठी सुरूही झालेले नाहीत. मात्र, त्यांवर आधीच भगदाडे पडल्याचा आरोप डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केला आहे. डॉ. परुळेकर म्हणाले, “या पुलांवरील भगदाडे नागरिकांच्या नजरेस पडू नयेत म्हणून ती लपविण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यावर घाईघाईने प्लास्टरिंग केले जात आहे.”
ते पुढे म्हणाले, “मुंबई-गोवा महामार्गावर सध्या वाहतूक अत्यंत तुरळक आहे. ट्रॅफिक जामचा कोणताही प्रश्न नसताना हे फ्लायओव्हर पूल उभारण्याची गरज काय होती, हा प्रश्न उपस्थित होतो. हे पूल नेमके कोणाचे ‘हात ओले’ करण्यासाठी बांधण्यात आले, हे अनाकलनीय आहे. जनतेच्या पैशावर हा ‘४० टक्क्यांचा खेळ’ सुरू आहे का, अशी शंका निर्माण होते.” निकृष्ट दर्जाचे बांधकाम करून हे पूल उभारण्यात आले असतील आणि भविष्यात ते कोसळून त्यावरून जाणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात झाला, तर त्याची जबाबदारी कोण घेणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
डॉ. परुळेकर यांनी या फ्लायओव्हर पुलांच्या बांधकामाचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करण्याची मागणी केली. “हे पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे सुरक्षित असल्याची हमी सामान्य जनतेला मिळाली पाहिजे. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अशा गंभीर बाबींकडे संबंधित यंत्रणांनी तातडीने लक्ष द्यावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
