Mumbai Local Train: मध्य रेल्वेवर दहा १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांचं रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये होणार आहे. सोमवार, २० जुलैपासून या लोकल सीएसएमटी ते कल्याण, कर्जत आणि कर्जत-सीएसएमटी मार्गावर धावणार आहेत.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: मध्य रेल्वेवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. प्रवाशांच्या मागण्या अखेर रेल्वे प्रशासनाने ऐकल्या असून सोमवारपासून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढणार आहेत. यामुळे उपनगरिय रेल्वेवरील सर्वात व्यस्त मार्गावर गर्दीवर नियंत्रण ठेवणं शक्य होणार आहे. २० जुलैपासून १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.
सध्या मध्य रेल्वे मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्यांची संख्या २२ आहे. सोमवारपासून ही संख्या ३२ होणार आहे. परंतु, यासाठी कोणत्याही नव्या लोकल फेऱ्या वाढवण्यात येत नाही आहेत असंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दहा १२ डब्यांच्या लोकलला तीन डबे जोडून त्यांचं रुपांतर १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नागरिक १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवण्याची मागणी करत आहेत. पण मध्य रेल्वेच्या मार्गावरी स्थानकांमध्ये फलाट विस्ताराचं काम शिल्लक असल्यामुळे हे लांबलं गेलं. अजूनही अनेक स्थानकांवरील फलाट विस्ताराचं काम अपूर्ण असल्यामुळे केवळ दहा फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हळूहळू गर्दीच्या सर्व स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकल धावतील.
या दहा लोकलमध्ये अप मार्गावर पाच आणि डाऊन मार्गावर पाच लोकल असतील. या मार्गांवरील पूर्वीच्या १२ डब्यांच्या लोकल फेऱ्यांचं रुपांतरच १५ डब्यांच्या लोकलमध्ये करण्यात येणार आहे. वेळापत्रक जाणून घ्या-
डाऊन मार्गावर या लोकल १५ डब्यांच्या म्हणून चालतील:
सकाळी ९.१५ची सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल दुपारी १२.२६ ची (सध्या १२.१७ ला सुटणारी) सीएसएमटी ते कल्याण लोकल दुपारी ३.०३ ची सीएसएमटी ते बदलापूर लोकल सायंकाळी ६.२१ ची सीएसएमटी ते कर्जत लोकल रात्री ११.०८ची सीएसएमटी ते अंबरनाथ लोकल
अप मार्गावर या लोकल १५ डब्यांच्या म्हणून चालतील:
सकाळी ७.५१ ची अंबरनाथ ते सीएसएमटी लोकल सकाळी ११.०३ ची अंबरनाथ ते सीएसएमटी लोकल (या धीम्या लोकलला जलद लोकल म्हणून चालवलं जाईल) दुपारी १.३० ची कल्याण सीएसएमटी लोकल सायंकाळी ४.४७ची बदलापूर ते सीएसएमटी लोकल रात्री ८.३८ ची कर्जत ते सीएसएमटी लोकल
गर्दीच्या वेळेत दोन मुख्य सेवा असतील. यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. कर्जत-अंबरनाथ जलद लोकलमध्ये गर्दीच्या वेळी प्रवासी अक्षरश: दरवाज्यावर लटकून प्रवास करतात. यामुळे अनेक अपघात होतात. मध्य रेल्वने हे स्पष्ट केलं आहे की कोणत्याही नव्या लोकल फेऱ्या सुरू करण्यात येत नाही आहेत. सध्या रेल्वे मार्गावर धावत असलेल्या १२ डब्यांच्या लोकलचं १५ डब्यांच्या म्हणून चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे मध्य रेल्वेच्या सध्याच्या वेळापत्रकात काहीही बदल होणार नाही आहे. या १५ डब्यांच्या लोकल यापूर्वी ठरेलेल्या वेळेवरच धावणार आहेत.
मध्य रेल्वेवर ठाणे- कल्याण आणि कल्याण ते बदलापूर पट्ट्यात प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून तिसऱ्या व चौथ्या मार्गिकेचं काम करण्याची मागणी केली जात आहे. तसेच, सर्व स्थानकांवर १५ डब्यांच्या लोकलला थांबे देण्यासाठी फलाट विस्ताराच्या कांमांना वेग देण्याच्या मागण्या केल्या जात आहेत. तुमच्या मते रेल्वेने अजून कोणत्या मार्गावर १५ डब्यांच्या लोकल फेऱ्या वाढवल्या पाहिजेत, कमेंटमध्ये सांगा
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा