Headlines

नवी मुंबईच्या धर्तीवर ‘नवे पुणे’, पुरंदरमध्ये शहराचा नियोजित विस्तार करावा; नितीन गडकरींची सरकारला सूचना| Maharashtra Times


Nitin Gadkari: पुण्यातील नव्या प्रकल्पांचं भूमिपूजन करताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी पुण्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहतुकीच्या ताणामुळे पुरंदर तालुक्या नवे पुणे विकसित करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रस्तावित विमानतळाजवळ हे शहर असेल.

पुरंदरमध्ये नवे पुणे
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पुणे शहरावरील लोकसंख्येचा आणि वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता, नवी मुंबईच्या धर्तीवर पुरंदर तालुक्यात ‘ नवे पुणे ’ विकसित करण्याचा विचार राज्य सरकारने करावा,’ अशी महत्त्वपूर्ण सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी केली. पुण्याचा नियोजित विस्तार करण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

‘देशातील काही शहरांमध्ये लोकसंख्येची वाढ मर्यादित ठेवण्याचा विचार करावा लागेल; अन्यथा रस्ते आणि पूल कितीही बांधले, तरी भविष्यात रस्त्यावर चालणेही कठीण होईल. त्यामुळे पुरंदरच्या दिशेने नव्या पुण्याचा विकास करणे आवश्यक आहे,’ असे गडकरी म्हणाले.

Maharashtra TimesDive Ghat Twin Tunnels: दुहेरी बोगद्यातून रस्ते आणि मेट्रो, पुरंदर विमानतळासाठी नव्या प्रकल्पाचा विचार; कुठे-कसा असेल?

दर्जेदार पायाभूत सुविधा उभारणार

पुणे-शिरूर, हडपसर-यवत आणि तळेगाव-शिक्रापूर या तीन उन्नत महामार्गांची उभारणी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने करण्यात येणार असल्याचे गडकरी यांनी सांगितले. ‘भारतीय रस्ते काँग्रेसच्या निकषानुसार दोन खांबांमधील अंतर ३० मीटर असते; मात्र मलेशियातील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रकल्पांमध्ये हे अंतर १२० मीटर ठेवले जाणार आहे. त्यामुळे खांबांची संख्या कमी होऊन प्रकल्पाचा खर्चही कमी होणार आहे. या मार्गांमध्ये तळाला सामान्य रस्ता, त्यावर उड्डाणपूल आणि सर्वांत वर मेट्रो मार्ग अशा त्रिस्तरीय रचनेचा अवलंब करण्यात येणार आहे. त्यामुळे भविष्यातील वाहतूक गरजांचा विचार करून दर्जेदार पायाभूत सुविधा उभारल्या जातील,’ असे त्यांनी नमूद केले.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचएआय) माध्यमातून पुणे परिसरात सुमारे ५० हजार कोटी रुपयांच्या रस्ते प्रकल्पांना वर्षभरात गती मिळणारआहे. प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होईल, प्रवासाचा वेळ वाचेल आणि प्रदूषणातही घट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्य सरकारने विविध स्तरांवर सहकार्य केल्यामुळे या प्रकल्पांना गती मिळाल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री आणि राज्य सरकारचे आभार मानले.

प्रवासात वेळ वाचणार

‘शिरूर ते छत्रपती संभाजीनगर या सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुणे-छत्रपती संभाजीनगर प्रवास अवघ्या दोन तासांत, तर छत्रपती संभाजीनगर-नागपूर प्रवास अडीच तासांत होईल. त्यामुळे पुणे-नागपूर हे अंतर सुमारे साडेचार तासांत पार करणे शक्य होईल,’ असे गडकरी यांनी सांगितले. या महामार्गातील काही अडचणींबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून, त्यावर लवकरच मार्ग काढला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नाशिक फाटा-खेड महामार्गाला मंजुरी देण्याची गरज भाषणात मांडली. त्यावर उत्तर देताना गडकरी म्हणाले, ‘या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तयार आहे. मात्र, वित्त विभागाने शंभर टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करता येणार नसल्याचे नमूद केले आहे. उर्वरित भूसंपादन पूर्ण होताच पुढील काही दिवसांत या प्रकल्पालाही सुरुवात केली जाईल.’

Maharashtra TimesPune News: पुण्यातील उन्नत महामार्गांसाठी २५ वर्षे टोल; पुणे-शिरूर, हडपसर ते यवत, तळेगाव-शिक्रापूर मार्गांचा विकास होणार

गडकरींचे महत्त्वाचे संकेत

पुणे-सातारा मार्गावरील खंबाटकी घाटातील दुसऱ्या बोगद्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण होणार.
नन्हे-रावेत उन्नत महामार्गाचा डीपीआर तयार असून, लवकरच कामाला सुरुवात होणार.
पुणे-मुंबईदरम्यान आणखी एक द्रुतगती महामार्ग उभारला जाणार असून, पहिल्या टप्प्याची निविदा तीन महिन्यांत काढली जाणार.
ठाणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गाच्या कामालाही लवकरच प्रारंभहोणार.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा