औद्योगिक शहर, सर्वाधिक वेगाने वाढलेले शहर आणि बरेच काही म्हणवून घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या पायाभूत सुविधांच्या अव्यवस्थेची यादी दिवसेंदिवस लांबच लांब होत आहे. वर्षानुवर्षे रेंगाळलेला पाणीप्रश्न, मुख्य रस्त्यावर चुकीचे केलेले पण म्हणवले जाणारे चौक, वाहतूक कोंडी दूर करण्याऐवजी वाढवणारे उड्डाणपूल, सी-सॉ चा खेळ करायला लावणारे असमान रस्ते, रुंद केलेल्या रस्त्यात अपघातास निमंत्रण देत उभे असलेले विजेचे खांब, मोकळ्या जागेचा अवैध पार्किंगसाठी होणारा वापर अशी किती तरी उदाहरणे देता येतील.
या सर्वात नेहमीचा कळीचा मुद्दा ठरतो ते पायाभूत सुविधांचा मुद्दा. पायाभूत सुविधांचा पाया म्हणजे रस्ते. कुठल्याही शहरात याची पूर्तता करताना सरकारी यंत्रणा पुढच्या २५ वर्षांचा विचार करतात, असे म्हटले जाते. पण हे करताना नागरिकांना नेमके काय हवे? कोणत्या सुविधांनी फायदा होईल, याचा विचार केला जातो की नाही ते धोरणकर्त्यांना माहीत असावे.
छत्रपती संभाजीनगरमधील दक्षिण बाजूच्या छत्रपती शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाच्या मॉडेलवरून सातत्याने नियोजनाचे तीन तेरा वाजल्याचे उत्तम उदाहरण अशी टीका केली जाते. हे मॉडेल चुकले की उभारणीचे इंजिनीअरिंग की भुयारी मार्गाच्या पलीकडे राहणाऱ्या किंवा या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचेच काही चुकले, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. शहराच्या दक्षिण बाजूने गेल्या अडीच दशकांत लाखोंची नागरी वसाहत उभी राहिली.
मुख्य शहराशी उत्तर-दक्षिण होताना सातारा, देवळाईसह लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिलेल्या नागरी वसाहतीतील रहिवाशांना रेल्वे रूळ पार करून यावे लागते. साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या टप्प्यात चार ते पाच ठिकाणांहून या जोडणीचा विचार करून रेल्वेस्टेशन, शहानूरमियाँ दर्गा भागात दोन उड्डाणपूल उभे राहिले. नागरिकांची गैरसोय होऊ नये, हा या मागचा हेतू. पुढे वाढणारी वसाहत लक्षात घेऊन प्रस्तावित रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील उड्डाणपुलाला दोन दशके उलटूनही अजून मुहूर्त सापडलेला नाही. बीड बायपासवर वाढलेली वाहनांची गर्दी, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांची डोकेदुखी झाली आहे.
जड वाहनांची २४ तास वर्दळ असलेल्या या रस्त्यावर शेकडो जणांचे अपघातात बळी गेल्यानंतर यंत्रणा जाग्या झाल्या आणि काम मार्गी लागले. रेल्वेच्या ताब्यातील जागेवर रेल्वे प्रशासन तर उर्वरित दोन टप्पे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाने पूर्ण करून रेल्वे भुयारी मार्ग उभारला. त्यासाठी वर्षभर वाहतूक बंद ठेवली गेली. नागरिकांनी त्रास सहन केला, पुढे दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र उभारणीनंतर पहिल्याच पावसात भुयारी मार्गात पाणी साचले आणि अजब इंजिनीअरिंगचा धोकादायक नमुना नागरिकांनी अनुभवला.
भुयारी मार्गातील चिखल पावसाळा संपूनही वाळलेला नव्हता. साचलेले पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा नव्हती. कसेबसे पाणी काढले तर चिखलावरून घसरून दुचाकीस्वार पडून जखमी होऊ लागले. एकाचा बळी गेला. ३८ कोटी ४० लाख रुपये खर्चून उभारलेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण ही राजकीय हट्टापायी अपूर्ण स्थितीत केले गेले होते.
भुयारी मार्गाची उंची कमी असल्याने ठरावीक उंचीच्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणे अपेक्षित आहे, पण हे पाहण्याची यंत्रणा उभीच केलेली नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत भुयारी मार्गात वाहने अडकण्याच्या तीन घटना घडल्या. इथे दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. जड वाहनांसाठी पुरेशी जागा नाही. पाणी तुंबले की छोट्या वाहनांची कोंडी होते. १२ व २५ जुलै रोजी पावसाने भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या रांगा हे चित्र पुन्हा अनुभवयास मिळाले. अगदी दोन दिवसांपूर्वी एक बस भुयारी मार्गात मध्यभागी बंद पडली. एका बाजूची वाहतूक चार तास ठप्प होती. वारंवार मागणी करूनही रेल्वे भुयारी मार्गाचे अडथळे दूर केले जात नाहीत. त्रस्त नागरिकांची ही फरफट कधी थांबणार?

