Vidharbh News:विदर्भात पावसाच्या दमदार हजेरी नंतर आता मात्र विदर्भात पावसाची संततधार बरसत असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला.परंतू रस्ते वाहून गेल्याने वाहनांची चांगलीच गैरसोय झाली

मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये सध्या मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस तसेच विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. मध्य उत्तर प्रदेश आणि ईशान्य मध्य प्रदेशावर निर्माण झालेल्या चक्रीवादळाच्या स्थितीमुळे विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. बुलढाणा जिल्ह्यात दिवसभर पाऊस सुरू असल्याने पिकांना जीवदान मिळाले.
पिकांना दिलासा पण शेतकऱ्यांची मोठी लगबग
भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळताच शेतीकामांना वेग आला असून, धानाच्या रोवणीच्या कामांना गती मिळाली आहे. सध्या रोवणीचा काळ सुरू झाला असून, शेतकरी पहाटेपासूनच शेतात दाखल होत आहेत. मात्र, या कामांसाठी लागणाऱ्या मजुरांची संख्या कमी पडत असल्याने शेतकऱ्यांची मोठी लगबग उडाली आहे.
रस्ता वाहून गेला परिणामी शेकडो वाहने महामार्गावर अडकली
चंद्रपूर शहरासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस बरसला. जिल्ह्यात मागील २४ तासांत सरासरी २६.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी-आलापल्ली-सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील रेपणपल्लीजवळ पुलाच्या बांधकामासाठी तयार करण्यात आलेला तात्पुरता वळण रस्ता मंगळवारी सकाळच्या संततधार पावसात वाहून गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली.परिणामी,शेकडो वाहने महामार्गावर अडकली असून हजारो प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. या परिस्थितीचा एसटी सेवेलाही फटका बसला. अहेरी- सिरोंचा बस रेपणपल्लीजवळ अडकल्यानंतर गोलाकर्जी-राजाराम-छल्लेवाडा-कमलापूर मार्गे तब्बल २३ किलोमीटरचा अतिरिक्त वळसा घालावा लागला.
पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे
धापेवाडा बॅरेजला पाण्याची आवक वाढत असल्यामुळे पाण्याचा विसर्ग १०४४ क्युमेक्स वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे वैनगंगेच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. भंडारा येथील वैनगंगेची धोक्याची पातळी २४५.५० मीटर असून सध्याची पातळी २४३.६२ मीटरवर आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यात दमदार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील काही ग्रामीण मार्ग प्रभावित झाले आहेत. खमारी गावाला जोडणारा पूल लहान असल्याने या पुलावर पाणी चढल्याने या मार्गावरील वाहतूक प्रभावित झाली आहे.

