Thane News:भुलेश्वर येथील गणेशमूर्ती कोसळण्याच्या घटनेचे पडसाद ठाण्यातही उमटले आहेत. ठाण्यातील गणेशोत्सव सुरक्षितपणे पार पडण्यासाठी महापालिका प्रशासनाने आगाऊ नियोजन करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी लोकप्रतिनिधींकडून केली जात आहे

प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक
भुलेश्वर येथे गणेशमूर्तींच्या आगमनावेळी शनिवारी मूर्ती कोसळून घडलेल्या दुर्घटनेत दोन पदाधिकाऱ्यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर सर्वच स्तरांतून शोक व्यक्त होत असताना ठाण्यातील गणेशोत्सव मंडळांच्या मंडपांची अनामत रक्कम व भाडे माफ करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते नजीब मु्ल्ला यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे. गणेशोत्सव काळात कोणत्याही नागरिकाच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे मुल्ला यांनी पत्रात नमूद केले आहे.
ट्रॉलीची तपासणी आवश्यक
मोठ्या व उंच गणेशमूर्तीच्या बाबतीत मूर्तीची लोखंडी फ्रेम ,वेल्डिंग ,आधार प्रणाली ,ट्रॉली ,चाके ,ब्रेक आदींची तांत्रिक तपासणी केल्यानंतरच मिरवणुकीस परवानगी देण्यात यावी. मूर्ती वाहून नेताना योग्य सुरक्षा व्यवस्था आणि प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध आहे, याचीही खात्री करावी ,असे मुल्ला यांनी पत्रात सुचवले आहे.
अडथळे तातडीने दूर करा.
मोठ्या गणेशमूर्तीच्या आगमन व विसर्जन मार्गाची महापालिका, वाहतूक पोलिस आणि संबंधित विभागांच्या संयुक्त पथकाकडून तातडीने पाहणी करावी. रस्त्यांवरील खड्डे, उंच-सखल भाग, अर्धवट विकासकामे, झाडांच्या धोकादायक फांद्या, विद्युतवाहिन्या तसेच इतर अडथळे तातडीने दूर करावेत, अशी मागणी मुल्ला यांनी केली.
समाजमाध्यमांवरील संदेशांबाबत सतर्क रहा
विविध समाजमाध्यंमावरील संदेश परदेशात प्रसारित झालेले असतात.ते संदेश मॉर्फ करून काही समाजकंटक आपल्या देशातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी प्रसारित करत असतात. त्यामुळे नागरिकांनी याबाब सतर्क रहावे,असे आवाहन पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी शांतता समितीच्या बैठकीत केले. सण-उत्सवांदरम्यान ध्वनिप्रदूषण होणार नाही. याची काळजी घ्यावी.तसेच गणेशमूर्तींच्या संरक्षणाची जबाबदारी गणेश मंडळांनी घ्यावी , अशी सूचनाही त्यांनी केली.
ठाणे पोलिस आयुक्तालय
ठाणे पोलिस आयुक्तालय स्तरावरील शांतता समितीच्या सदस्यांची बैठक सोमवारी ठाण्यातील सिध्दी हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती.सदस्यांनी काही सूचना मांडल्या.त्यानंतर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे ,पोलिस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण ,अपर पोलिस आयुक्त संजय जाधव यांनी मार्गदर्शन केले.
न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मंडळांनी तसेच नागरिकांनी करणे गरजेचे
आगामी काळ हा सण -उत्सवांचा असून सर्वसामान्य जनता आणि पोलिस यांच्यामधील शांतता समिती सदस्य हे दुवा म्हणून काम करतात. तरुण वर्ग हा समाजातील महत्त्वाचा घटक असून शांतता समिती सदस्यांनी त्यांच्याशी संपर्कात राहणे अतिशय गरजेचे असल्याचे पोलिस आयुक्त डुंबरे यांनी सांगितले.न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन मंडळांनी तसेच नागरिकांनी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.
घटनेच्या संदर्भात खात्री केल्याशिवाय व्हॉट्सअॅपवर संदेश फॉरवर्ड करू नका
आजच्या डिजिटल युगामध्ये व्हॉट्सअॅपवर अफवा पसरणार नाहीत,याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. एखाद्या घटनेच्या संदर्भात खात्री केल्याशिवाय व्हॉट्सअॅपवर संदेश फॉरवर्ड करू नये. मोबाइल वापरताना प्रत्येकाने आवश्यक काळजी घ्यावी .प्रत्येक सण धार्मिक सद्भावना राखून साजरा करा. आगामी सणांच्या काळात शांतता राखण्यासाठी सर्व समाजांच्या प्रमुख नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्तांनी केले.

