नेपाळमधीसल भीषण पुराचे व्हिडीओ समोर येत आहेत. मृतांचा आकडा ६०० च्या पुढे गेला आहे. महाकाय पूल, रस्ते, महत्त्वाचे प्रकल्प या भीषण पुरात उद्ध्वस्त झाले आहेत. या सगळ्यात एका घराचा व्हिडीओ विशेष चर्चेत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळमध्ये आलेल्या पुरातील मृतांचा आकडा ५५० च्या पुढे गेला आहे. अद्यापही हजारच्या आसपास नागरिक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. या पुरानं नेपाळचं अतोनात नुकसान झालं आहे. देशातील पूल, जलविद्युत प्रकल्पाचं उद्ध्वस्त झाले आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. चीन आणि तिबेटला लागून असलेल्या नेपाळच्या भागांमधील मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. याच दरम्यान पुराच्या प्रचंड पाण्यातील एका घराचा व्हिडीओ पाहून सर्वसामान्यांपासून तज्ज्ञही विस्मयचकित झाले आहेत.
नेपाळच्या तिबेट सीमेला लागून असलेल्या गावातील एक व्हिडीओ समोर आला आहे. २६ ऑगस्टला अचानक आलेल्या पुरात जवळपास संपूर्ण गाव वाहून गेलं. दोन मिनिटांच्या व्हिडीओत चिखल, पाणी आणि ढिगाऱ्याच्या मधोमध एक घर उभं असलेलं दिसतं. त्याचवेळी मोठमोठी घरं आणि वाहनं अगदी खेळण्याप्रमाणे वाहून जाताना दिसत आहेत. आसपास निसर्गाचा रुद्रावतार सुरू असताना एक घर अगदी निश्चल उभं आहे.
व्हिडीओमध्ये नेमकं काय?
भीषण पूर आलेला असताना फिक्कट हिरव्या रंगाच्या दुमजली घराचं फारसं नुकसान झालं नाही. घराच्या चारही बाजूंना पुराचं पाणी असताना, चिखल-गाळ वाहून जात असताना दुमजली घर दिमाखात उभं होतं. पुढच्या काही मिनिटांत हे घरदेखील पुराच्या प्रचंड पाण्यात वाहून जाईल, अशी भीती व्हिडीओ पाहणाऱ्यांना वाटत होती. पण हे घर पुराच्या पाण्यात मजबुतीनं उभं राहिलं.
व्हिडीओमध्ये एका कुटुंबातील तीन सदस्य घराच्या दुसऱ्या मजल्याच्या बाल्कनीत अडकलेले दिसत आहेत. त्यांच्या चारही बाजूंनी चिखल, राडारोडा, ऍस्बेस्टॉसच्या शीट्स वाहून जात आहेत. या सगळ्या वस्तू घराला धडकून पुढे जात आहेत. पण ही सगळी संकटं या घरानं अगदी लिलया पेलली. त्यामुळे या घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भीषण पुरातही सुरक्षित राहिल्यानं फिक्कट हिरव्या रंगाचं घर सोशल मीडियावर मजबुतीचं प्रतीक बनलं आहे. भुटे कोशी नदीच्या तीरावर चिखल, ढिगाऱ्याचा मारा, जलप्रलयाचा सामना करत असलेल्या घराच्या इंजिनीअरला बक्षीस देण्याची मागणी सोशल मीडियावर अनेकांनी केली आहे.
आसपासची सगळी घर जमीनदोस्त होत असताना, मोठमोठ्या इमारती कोसळत असताना, पूल वाहून जात असताना दुमजली घर दिमाखात उभं राहिलं. महासंकटाचा अगदी नेटानं सामना करणारं घर बांधणाऱ्या इंजिनीअरचं कौतुक, त्याचा सन्मान व्हायला हवा, अशी मागणी नेटकऱ्यांनी केली आहे.
लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.
पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.
मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.
‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.
टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.
लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.
लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.
२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.
शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.… आणखी वाचा