Nanded District Central Cooprative Bank Election : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या एकतर्फी निवडणुकीमध्ये खा.अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील बहुपक्षीय शेतकरी विकास पॅनेलने 23 पैकी 21 जागा जिंकून आपलं वर्चस्व सिद्ध केलं.

चिखलीकर यांची प्रतिष्ठापणाला
नांदेड मद्यवर्ती सहकारी बँकेच्या 23 संचालक पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यात 11 जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यात भाजपचे तीन आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एका आमदारासह इतर सात जणांची बिनविरोध निवड झाली होती. 12 जागेसाठी रविवारी मतदान घेण्यात आले . मंगळवारी जाहीर झालेल्या निकालात शेतकरी विकास पॅनलचे 23 पैकी 21 संचालक निवडून आले तर संगीता पाटील डक आणि कृष्णा पाटील आष्टीकर या दोन अपक्ष उमेदवारांचा विजय झाला. या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, कॉग्रेस खासदार रवींद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. विशेष म्हणजे बँकेत सत्ता मिळवण्यासाठी तिन्ही पक्षाचे नेते एकत्र येत शेतकरी विकास पॅनल निर्माण केले. यात आजी माजी आमदारासह त्यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूकीच्या रिंगणात उभे होते. या सर्वांचा विजय झाला आहे. दरम्यान माजी आमदार माधव पाटील जवळगावकर यांचा एक मताने विजयी झाले. तर शिवसेना ठाकरे गटाचे नेते ज्योतिबा खराटे यांचा दोन मतांनी पराभव झाला. दरम्यान या निवडणुकीत सर्वपक्षीय नेत्यांनी हातात हात घालून निवडणूक लढवल्याने पॅनलच्या उमेदवारांचा एकतर्फी विजय सुकर झाला अशी चर्चा सुरु आहे.
Pune Crime News : आणखी एक सिया अन् नवा स्कॅम, पुण्याच्या मुळशीतील पोलीस पाटलांची फसवणूक; 10 कोटींचं आमिष अन्…
घराणेशाहीचा पुन्हा एकदा बोलबाला
शेतकऱ्यांचे हित जपणाऱ्या या मध्यवर्ती बँकेत बिनविरोध आणि बहुमताने निवडून आलेल्या संचालकांमध्ये बहुतांश आजी-माजी आमदार, खासदार आणि त्यांच्या थेट कुटुंबातील सदस्यांचीच वर्णी लागली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि शेतकरी वर्गात या घराणेशाही बाबत जोरदार चर्चा रंगली आहे. आपली आणि आपल्या नातेवाईकांची वर्णी लागण्यासाठी सर्वपक्षीय नेते एकत्र आले होते. आमदार प्रताप पाटील चिखलीकर आमदार तुषार राठोड आणि आमदार भीमराव केराम यांची बिनविरोध निवड झाली होती. नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणारी अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. या बँकेवर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींपेक्षा राजकीय घराण्यातील नेत्यांचाच भरणा अधिक झाल्याने, ही बँक खरोखरच सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेणार की बड्या नेत्यांचे राजकीय पुनर्वसन करण्याचे केंद्र बनणार, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
विजयी झालेले दिग्गज व नेत्यांचे नातेवाईक
प्रताप पाटील चिखलीकर (आमदार राष्ट्रवादी अजित पवार गट), तुषार राठोड (आमदार भाजप), भीमराव केराम (आमदार भाजप), पूनम पवार (आमदार राजेश पवार यांच्या पत्नी), माधव जवळगावकर (माजी आमदार), प्रणिता पाटील चिखलीकर (आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या कन्या व भाजप प्रदेश महामंत्री), कृष्णा पाटील आष्टीकर (खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र), मीनल खतगावकर (माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई), श्रीनिवास चव्हाण (काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांचे सख्ये काका), कैलास गोरठेकर (दिवंगत माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे सुपुत्र), सुशीला बेटमोगरेकर (माजी आमदार हणमंत पाटील बेटमोगरेकर यांच्या पत्नी) आदींचा समावेश आहे.
Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; पात्र असतानाही कर्जमाफी मिळाली नसल्यास कुठे करावी तक्रार? जाणून घ्या…
काँग्रेस खासदारावर पक्षातील पदाधिकारी नाराज
जिल्हा बँकेची निवडणूक ही राजकीय पक्षाची निवडणूक नसली तरी नेत्यांचे विशेष लक्ष लागले होते. या निवडणुकीच्या माध्यमातून काँग्रेस रवींद्र चव्हाण हे स्वतंत्र्य पॅनल उभे करून भाजपाला आवाहन देणार अस वाटतं होते, मात्र त्यांनी अशोक चव्हाण आणि आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हातात हात मिळवून पॅनलच्या माध्यमातून आपले उमेदवार उभे केले. यात बहुतांश कुटुंबियांतील सदस्यांना संधी देण्यात आली. काँग्रेसकडे उमेदवार असताना देखील खासदाराने अनेकांना उमेदवारी मागे घ्यायला लावली होती. काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे पक्षातील पदाधिकारी नाराज नसल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे काँग्रेस खासदार रविंद्र चव्हाण यांनी काकाला बिनविरोध निवडून आणण्यासाठी आपली उमेदवारी मागे घेतली होती.

