विद्यार्थ्यांना सर्वसामान्य आणि प्रथमश्रेणीच्या डब्यांचे पास सवलतीच्या दरात मिळत असले तरी एसी लोकलच्या पासात सूट देण्यास रेल्वे प्रशासनाकडून असमर्थता दर्शवण्यात येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असून, रेल्वे बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी सवलत योजनेत तातडीने एसी पासचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, यासाठी रेल्वे प्रवासी संघटना आक्रमक झाल्या आहेत.
Sachin Ahir : सुषमा अंधारे चळवळीतील कार्यकर्त्या, पक्ष सोडणार नाहीत, पण ठाकरेंनी योग्य न्याय द्यावा, सचिन अहिरांची अपेक्षा
मुंबई उपनगरीय लोकल मार्गांवरील अनेक पारंपरिक ईएमयू लोकलच्या जागी एसी लोकल सुरू केल्या जात आहेत. मात्र, एसी लोकलमध्ये शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलतीच्या आधारे पास दिला जात नसल्याने विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे. गेल्या आठवड्यात कल्याण रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील तिकीट खिडकीवर दोन विद्यार्थी महाविद्यालयाच्या सवलत प्रमाणपत्राच्या आधारे एसी लोकलचा पास काढण्यासाठी गेले होते. त्यांना सवलतीचा पास देण्यास नकार देत महाविद्यालयाच्या अर्जासह केवळ साध्या लोकल गाड्यांसाठीचा सवलत पास देणार असल्याचे या विद्यार्थ्यांना कळवण्यात आले.
या प्रकरणी कल्याणच्या मुख्य तिकीट निरीक्षकांकडे विचारणा केल्यानंतर तेथे सध्याच्या नियमांनुसार एसी लोकलसाठी विद्यार्थ्यांना सवलत उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांसाठी एसी लोकलमध्ये सवलतीची योजना लागू करता येत नसेल, तर सर्वसामान्य ईएमयू लोकलच्या फेऱ्या कमी करून त्यांच्या जागी एसी लोकल सुरू करण्याचे धोरणही फेरविचारात घ्यावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनांनी केली आहे. वातानुकुलित लोकलमधील विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरामध्ये पास देण्यासंदर्भातकोणत्याही प्रकारचे निर्देश नसल्यामुळे सवलत दिली जात नसल्याचे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
Nitesh Rane: नितेश राणेंविरोधात मच्छिमारांचा संताप; थेट बडतर्फची मागणी, मोठं नुकसान झाल्याचा आरोप
विद्यार्थ्यांना एसी लोकलचा प्रवास नाकारण्यात आल्याने साध्या लोकलचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे शाळा-कॉलेजमध्ये वेळेवर पोहचण्यात अडचण येते. हा अन्याय दूर करावा. – शाम उबाळे, मध्य रेल्वेची विभागीय रेल्वे प्रवासी सल्लागार समिती
सुरक्षित प्रवासासाठी विद्यार्थ्यांना एसी लोकलचा पास सवलतीत देणे आवश्यक आहे. गर्दीमुळे प्रवास जिकिरीचा झाला असताना या सवलतीमुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल.–संदीप पाचंगे, सरचिटणीस, मनविसे

