कोल्हापूर – राज्यासह कोल्हापूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपुन काढले आहे.. जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनावर परिणाम होऊ लागला आहे. गेल्या चोवीस तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत सुमारे एक फूट वाढ झाली आहे.. वाढत्या पाण्यामुळे कोल्हापुर शहरालगतचा शिंगणापूर बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
त्याचबरोबर इचलकरंजी, रुई, यवलूज आणि शिरोळ येथील बंधारेही जलमय झाल्याने काही भागांतील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून आवश्यक त्या ठिकाणी खबरदारीचे उपाय सुरू करण्यात आले आहेत.
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने आजपासून पुढील तीन दिवस कोल्हापूर जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी नदी, ओढे आणि पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांवर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
