मुंबई :राज्यात मान्सुनने जोरदार बॅटींग सुरु केली आहे.. अनेक भागांमध्ये मान्सूनने पुन्हा जोर पकडला असून पुढील तीन दिवस पावसाची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार कोकण, सह्याद्री परिसर आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतो. त्यामुळे विविध जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच नाशिक, पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथा भागात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन रेड अलर्ट देण्यात आला आहे. या भागांमध्ये कमी वेळात मोठ्या प्रमाणावर पाऊस होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
कोकण आणि विदर्भात पावसाच्या जोरदार सरी सुरू राहण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांसाठी रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागांत पाणी साचणे, घाटरस्त्यांवर दरड कोसळण्याचा धोका तसेच वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, नाशिकचा उर्वरित भाग, कोल्हापूरचा घाटमाथा तसेच विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
