मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषदेत शेतकरी कर्जमाफी, अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित प्रदर्शन आणि दिल्लीतील सुरू असलेल्या आंदोलनांवर भूमिका मांडली. उद्या शेतकरी कर्जमाफीची प्राथमिक यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहि
.
उद्याच कर्जमाफीची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता
मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून उद्याच (22 जुलै) प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सहकार विभागाने यासाठी आवश्यक तयारी केली असून, अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधत ही यादी प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अजित पवार यांच्या जीवनावर आधारित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन
यावेळी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन केल्याची माहिती दिली. या प्रदर्शनात त्यांच्या बालपणापासून राजकीय आणि सामाजिक प्रवासातील विविध क्षण छायाचित्रांच्या माध्यमातून मांडण्यात आले आहेत. अजित पवार यांचे व्यक्तिमत्त्व, त्यांचा उमदा स्वभाव, हास्य आणि नेतृत्वगुण या प्रदर्शनातून अनुभवता येतात. दादांवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाने हे प्रदर्शन पाहावे, असे आवाहन त्यांनी केले.
आंदोलनाचा अधिकार आहे, पण हिंसा मान्य नाही
दिल्लीतील आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, संविधानाने दिलेल्या अधिकारांसोबत जबाबदाऱ्यांचाही विचार केला पाहिजे. परवानगी घेऊन शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्यांना प्रशासन सहकार्य करेल. मात्र, विनापरवानगी आंदोलन, हिंसा आणि जाणीवपूर्वक राजकीय अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही.
‘फेसलेस’ आंदोलनात काही प्रवृत्ती घुसतात
फडणवीस म्हणाले की, नेतृत्वविरहित किंवा ‘फेसलेस’ आंदोलनांमध्ये काही स्वार्थी प्रवृत्ती घुसून आंदोलनाचा वापर स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी करतात. दिल्लीतील आंदोलनातही काही राजकीय पक्ष आणि विविध संघटना स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळली
कालच्या घटनेचा उल्लेख करत मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही सरकारला आपल्या नागरिकांवर लाठीचार्ज करणे आवडत नाही. मात्र, परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी आवश्यक तेवढीच कारवाई केली. पोलिसांनी मोठा संयम दाखवला असून, अधिक गंभीर घटना टाळण्यासाठी ही कारवाई आवश्यक होती, असे त्यांनी सांगितले.
‘सर्व आंदोलकांवर आरोप नाही, पण काहींचा वेगळा अजेंडा’
मुख्यमंत्री म्हणाले की, सर्व आंदोलकांवर आरोप करणे योग्य नाही. अनेकजण चांगल्या हेतूने आंदोलनात सहभागी झाले असतील. मात्र, काही लोक केवळ अराजकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आंदोलनात सहभागी झाले आहेत. काहींना नीटच्या प्रश्नाशीही संबंध नसून ते स्वतःचा राजकीय अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
दिल्लीतील आंदोलन आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्था याबाबत सरकार सजग असून, शांततापूर्ण आंदोलनाला संरक्षण दिले जाईल; मात्र हिंसाचार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
संबंधित बातमी वाचा…
कृषिमंत्र्यांची मोठी घोषणा:शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार; 30 जुलैपूर्वी खात्यात पैसे जमा होणार

राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थींची प्राथमिक यादी उद्या (22 जुलै) जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, 30 जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाहीही त्यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी
