Headlines

Crime News : दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी टाकून मातेने जीवन संपवले


घरातील तक्रारीच्या कारणावरून जीवन संपवले

सांगोला : घरातील तक्रारीच्या कारणावरून रागाच्या भरात विवाहितेने घरासमोरील विहिरीत आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह उडी टाकून जीवन संपवले. ही घटना बुधवार, १ जुलै रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घटुकडे वस्ती, घेरडी (ता. सांगोला) येथे घडली. रात्री उशिरा ही घटना समोर आली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

वैष्णवी आशिष यमगर (वय२८), तेजश्री आशिष यमगर (वय साडेतीन वर्ष) व रुद्राक्ष आशिष यमगर (वय १५ महिने, सर्व रा. घेरडी, ता. सांगोला) अशी पाण्यात बुडून मृत पावलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली असून पोलीस उपनिरीक्षक संजय राऊत तपास करीत आहेत.

आशिष महादेव यमगर (वय ३५, रा. वाकी रोड, यमगर, घुटुकडे वस्ती, घेरडी, ता. सांगोला) यांचा शिरनांदगी (ता. मंगळवेढा) येथील बाळू बाबूराव थोरबोले यांची मुलगी वैष्णवी हिच्याबरोबर पाच ते सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर नवरा आशिष यमगर हे पत्नीसह मुंबई येथे कामासाठी गेले होते.

ते चालक म्हणून खाजगी कंपनीत काम करीत होते. त्यांना तेजश्री (वय साडेतीन वर्ष) व रुद्राक्ष (वय १५ महिने) अशी दोन मुले होती. ते कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त आपल्या गावी पत्नी व मुलांसह जूनच्या शेवटच्या आठवड्यात आले होते.

दरम्यान बुधवार, १ जुलै रोजी रात्री साडेसातपूर्वी वैष्णवी हिने घरातील तक्रारीवरून रागाच्या भरात आपल्या तेजश्री व रुद्राक्ष या दोन मुलांसह शेतातील घरासमोर असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन संपवले. नेमकी तक्रार काय झाली आणि कधीपासून वाद सुरु होता, याबाबत कोणतीही माहिती स्पष्ट झाली नाही. बाळू थोरबोले यांनी पोलिसांत खबर दिली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय राऊत करीत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत