Actor FIR Against Family : वडिलोपार्जित असलेली हवेली आजोबांच्या खोट्या सह्या घेऊन हडपल्या प्रकरणी अभिनेत्याने आपल्या काकी आणि आत्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

चंद्रचूड सिंग आणि त्याच्या भावाने दाखल केलेल्या एफआयआरमध्ये काका आणि काकी यांच्याव्यतिरिक्त इतर सात जणांचीही नावे आहेत. अभिनेत्याने सांगितले की, त्यांचे आजोबा हयात असताना मृत्युपत्र तयार करण्याच्या स्थितीत नव्हते; मात्र, त्यांच्या निधनानंतर काका आणि काकीने इतरांशी संगनमत करून हवेली बळकावली आणि जमीन विकली.
Apurva Nemlekar Mangalgaur : अपूर्वा नेमळेकरची पहिली मंगळागौर दणक्यात साजरी, भारतात नव्हे तर अमेरिकेत पारंपारिक उत्साहात रंगला खेळ
चंद्रचूड सिंहने ‘हवेली’चा ताबा आणि जमिनींच्या विक्रीबाबत भाष्य केले. यासंदर्भात ‘भारत समाचार’शी बोलताना तो म्हणाला, “आतापर्यंत सात जणांची नावे समोर आली आहेत आणि आणखी काही नावे पुढे येण्याची शक्यता आहे. हे प्रकरण प्रामुख्याने फसवणूक आणि बनावट कागदपत्रे तयार करण्याशी संबंधित आहे. जेव्हा माझे आजोबा आजारी होते, तेव्हा माझी आत्या तिथे साक्षीदार म्हणून उपस्थित होती. माझे आजोबा मृत्युपत्र तयार करण्याच्या मनस्थितीत किंवा शारीरिक स्थितीत नव्हते. त्यांच्या निधनानंतर त्यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली. माझे काका आणि आत्या यांनी तिथे उपस्थित असलेल्या दोन लहान मुलांसह आपसात संगनमत करून हे मृत्युपत्र तयार केले, जे पूर्णपणे बनावट आहे. यात सामील असलेल्या सात व्यक्तींचा या प्रकरणाशी संबंध आहे; त्यांनी साक्षीदार म्हणून काम केले आणि ते या गुन्ह्यात सहभागीही होते. त्यांनी जमिनींची विक्री केली ज्या जमिनींचे सर्वांमध्ये समान वाटप होणे अपेक्षित होते.”
चंद्रचूड सिंह हा जमीनदार कुटुंबातील असून त्याच्या जमिनी शेजारच्या गावांपर्यंत पसरलेल्या आहेत. विशेष म्हणजे, चंद्रचूड सिंह याचे वडील कॅप्टन बलदेव सिंह हे भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि 1985 मध्ये सदर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आमदार झाले होते. त्याचे कुटुंब अलीगडमधील जुन्या जमीनदार घराण्यांपैकी एक मानले जाते. त्याच्या जमिनी जलालपूर आणि आसपासच्या अनेक गावांमध्ये पसरलेल्या असून, कुटुंबातील सर्व सदस्यांचा त्यात समान वाटा आहे. पण, या जमिनींवरून अनेकदा वाद झाले आहेत; मात्र यावेळी परिस्थिती गंभीर वळणावर पोहोचली.
काकांच्या निधनानंतर मालमत्तेवरून वाद
‘दैनिक भास्कर’च्या वृत्तानुसार, चंद्रचूड सिंहच्या काकांच्या निधनानंतर जमिनीवरून वाद सुरू झाला. सुरुवातीला काका स्वीडनमध्ये राहत होते, परंतु भावाच्या निधनानंतर ते परत येऊन कौटुंबिक हवेलीत राहू लागले. मात्र, 2025 मध्ये चंद्रचूड सिंहच्या काकांचेही निधन झाले. त्यानंतर, ती जमीन आणि वडिलोपार्जित हवेलीवरील हक्क व ताबा यावरून कुटुंबात वाद निर्माण झाला.
आजोबांच्या निधनाच्या एक दिवस आधी बनावट मृत्युपत्र तयार
दरम्यान, चंद्रचूड सिंहचा भाऊ अभिमन्यू याने सांगितले की, आजोबांच्या निधनाच्या अवघ्या एका दिवस आधी एक बनावट मृत्युपत्र तयार करण्यात आले होते; या कारस्थानात त्यांची आत्या, घरातील सदस्य आणि काही बाहेरील व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांनी मिळून कुटुंबाची सर्व जमीन विकली आणि हवेलीचा ताबा घेतला. त्यांच्या म्हणण्यानुसार, आत्या आणि तिच्या मुलाने फसवणूक करून हवेली बळकावली आणि जमिनीही सोडल्या नाहीत. ही हवेली ‘द जलालपूर इस्टेट’ म्हणून ओळखली जाणारी एक ऐतिहासिक मालमत्ता असून ती 1870 मध्ये बांधण्यात आली होती. आता नोंदवलेल्या एफआयआरमध्ये सात जणांची नावे आहेत. ज्यामध्ये चंद्रचूड सिंहची आत्या, चुलत भावंडे (भाऊ आणि बहीण), दोन साक्षीदार, एक वकील आणि एका परदेशी नागरिकाचा समावेश आहे.
कोण आहे चंद्रचूर सिंह?
चंद्रचूर सिंग हा बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता आहेत. त्याने आपल्या संपूर्ण कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, ज्यात ‘माचीस’, ‘क्या कहना’, ‘सिलसिला है प्यार का’, ‘दाग: द फायर’, ‘जोश’ आणि ‘आमदानी अठानी खर्चा रुपैया’ सारख्या शीर्षकांचा समावेश आहे. 1996 मध्ये ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.

