Headlines

Ashwini Bhide BMC tells trees fell due to gusty winds Roads concretization not responsible; यंदा वाऱ्याचे प्रमाण जास्त असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान, अश्विनी भिडेंचं मत, पडझडीला काँक्रीटीकरण जबाबदार नाही


Mumbai News : फूटपाथखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या, काही ठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक ही झाडांच्या पडझडीमागे काही कारणे आहेत. याशिवाय यंदा पावसात वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान झाले, असे मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी सांगितले.

Rain Tree fell Ashwini Bhide Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : मुंबईत यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड होत आहे. झाडे किंवा फांद्या पडल्याने काही जणांचा मृत्यूही झाला आहे. झाडांच्या बुंध्यालगत असलेले काँक्रीटीकरण आणि त्यामुळे झाडांचे नुकसान होऊन त्याची पडझड होत असल्याचे मत तज्ज्ञांकडून मांडले जात आहे. मात्र, झाडांच्या पडझडीला काँक्रीटीकरण जबाबदार नसल्याचे मत मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी व्यक्त केले आहे.

‘वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान’

महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी मंगळवारी महापालिका मुख्यालयात महापालिकेशी संबंधित विविध विषयांवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या म्हणाल्या की, मुंबईत अनेक झाडे रस्त्यावर नसून, रस्त्याच्या बाजूला फूटपाथवर आहेत. फूटपाथखालून जाणाऱ्या सेवा वाहिन्या, काही ठिकाणी बसवलेले पेव्हर ब्लॉक ही काही कारणे झाडांच्या पडझडीमागे आहेत. याशिवाय यंदा पावसात वाऱ्याचे प्रमाण अधिक असल्याने झाडांचे सर्वाधिक नुकसान झाल्याचे भिडे यांनी सांगितले.

…म्हणून मुळांना धोका पोहोचतो

‘२०१८च्या वृक्षगणनेनुसार मुंबईत २९ लाख ७५ हजार झाडे आहेत. यापैकी रस्त्याच्या दुतर्फा दोन लाख झाडे आहेत. रस्त्यालगतची झाडे खूप धोकादायक असतात. झाडांलगत असलेले पाणी वाहून गटारात जाणे किंवा इतर वाहिन्या रस्त्याच्या खालून गेल्यानेही झाडांच्या मुळांना धोका पोहोचतो. रस्त्यांचे काँक्रीटीकरण केले जाते, काही ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले जातात. अशा ठिकाणी असलेल्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचविणे गरजेचे असते. संबंधित झाडांची मुळे कुठपर्यंत पसरलेली असतील याचा अंदाज घेऊन तिथपर्यंत छिद्रे करून त्यावर जाळी लावून पाणी टाकता येईल का, याबाबत महानगरपालिकेचा विचार सुरू आहे. असा प्रयोग यापूर्वी मलबार हिल परिसरात करण्यात आला होता’, असे भिडे यांनी सांगितले.
Maharashtra TimesMuskan Jain : प्लीज माझे प्रायव्हेट फोटो डिलीट कर, तरुणीची रडत विनवणी; ऑडिओ क्लीपने अख्खी केस पालटली, युगुलाच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट
‘अनेक झाडे ५० ते ६० वर्षे जुनी आहेत. त्यांची मुळे खूप खोलवर गेली आहेत. यासाठी रस्ते बांधत असताना कोणती काळजी घ्यावी यासाठी आमच्या सुनिश्चित कार्यपद्धती आहेत. त्यासाठी तज्ज्ञांचे मत जाणून घेऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. जमिनीखालून विविध यंत्रणांच्या वाहिनी गेलेल्या असतील तर कामे करतानाही योग्य ती काळजी घेतली जाईल’, असेही भिडे यांनी स्पष्ट केले.

Navnath waghmare On Sharad Pawar NCP | विनोद तावडे-जयंत पाटील यांच्या भेटीनंतर वाघमारेंचा निशाणा

झाडांच्या काळजीसाठी तज्ज्ञांची मदत घेणार

‘मुंबई विद्यापीठातील डॉ. संजय देशमुख यांच्यासारख्या काही तज्ज्ञांकडून माहिती घेऊन, तसेच आयआयटीकडूनही याबाबत उपाययोजना जाणून घेणार आहोत. जमिनीत खोलवर गेलेल्या झाडांच्या मुळांना पाणी पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. झाडांची शास्त्रोक्त छाटणी करण्यावरही भर देणार आहोत. रस्त्यालगतच्या दोन लाख झाडांपैकी एक लाख झाडांची यंदा महापालिकेकडून छाटणी केली आहे. यासोबतच या झाडांचे सर्वेक्षण करून जेथे छाटणीची गरज आहे तेथे ती केली जाईल. यासाठी सुनिश्चित कार्यपद्धती वापरण्यात येणार असून यासाठीही तज्ज्ञांचे मत घेतले जाणार आहे’, असे अश्विनी भिडे यांनी सांगितले.
Maharashtra TimesVasai Virar Rain : पाणी साचलंय, पण प्यायला नाही; वसई-विरारवासियांचे ‘पाऊस’हाल, चार्जिंग-वायफाय ठप्प, WFH करणाऱ्यांची कोंडी

वाऱ्याच्या वेगामुळेही पडझड

दरवर्षी पावसाळ्यात वारे वाहतात, मात्र यावर्षी गेल्या चार ते पाच दिवसांपासून ताशी ५० ते ७० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात झाडांचे खूप नुकसान झाल्याचे भिडे यांनी सांगितले. दरवर्षी वर्षभरात जेवढी झाडे पडतात त्याच्या ५० टक्के झाडे एका दिवसात पडली. २०२२मध्ये ६५५ झाडे पडली, २०२३मध्ये ६८७, २०२४मध्ये ६५३, २०२५मध्ये ८५५ झाडे, तर २०२६मध्ये ८३० झाडे पडली. ८३०पैकी ४८० झाडे खासगी क्षेत्रातील होती. पडलेल्या झाडांच्या मोबदल्यात कुठे आणि कोणती झाडे लावायची यासाठी अभ्यासकांची मते घेतली जातील, असे त्या म्हणाल्या.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा