Headlines

विराट-रोहित नाही, 9 जूनपासून द ओव्हलवर WTCची फायनल; पाचव्या स्थानावरील भारताला अंतिम फेरी गाठता येणार?


WTC Final 2027 : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ चक्रातील अंतिम सामना लंडनमधील द ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. ९ जूनपासून सुरू होणारा हा सामना १३ जूनपर्यंत चालेल. सध्याच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या तर भारत पाचव्या स्थानावर आहे.

schedule for 2027 world test championship final
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२५-२७ चक्रातील अंतिम सामन्याची तारीख आणि ठिकाण निश्चित झालं आहे. लंडनमधील द ओव्हल मैदानावर पुढील वर्षी ९ ते १३ जूनदरम्यान डब्ल्यूटीसीची फायनल खेळवली जाणार आहे. या अंतिम सामन्यात कोणते दोन संघ आमनेसामने येणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. भारताने यापूर्वी दोन वेळा डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली आहे. मात्र, दोन्ही वेळा टीम इंडियाला विजेतेपद मिळवता आलं नाही. सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर असलेल्या भारतासमोर यावेळी अंतिम फेरी गाठण्याचं मोठं आव्हान आहे.

द ओव्हलवर रंगणार डब्ल्यूटीसीची फायनल

आयसीसीने डब्ल्यूटीसीच्या पुढील तीन अंतिम सामन्यांचं आयोजन इंग्लंडमध्ये करण्याचा निर्णय यापूर्वीच जाहीर केला होता. त्यानुसार २०२७, २०२९ आणि २०३१ या वर्षांतील डब्ल्यूटीसी फायनल इंग्लंडमध्ये खेळवली जाणार आहे. आता २०२५-२७ चक्रातील अंतिम सामन्याची तारीखही निश्चित झाली आहे. ९ ते १३ जूनदरम्यान लंडनमधील द ओव्हल मैदानावर हा सामना होणार आहे.

Maharashtra TimesIND vs ZIM : भारत वि. झिम्बाब्वे टी-20 मॅच सुरू, 150 पेक्षा वेगाने टाकणाऱ्या बॉलरचा डेब्यू; कॅप्टन अय्यरला पहिल्या विजयाची आस

भारत दोनदा फायनलमध्ये, पण ट्रॉफी नाही

भारताने २०२१ आणि २०२३मध्ये डब्ल्यूटीसीची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, दोन्ही सामन्यांत टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला. २०२३मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना झाला होता. ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव करत डब्ल्यूटीसीचं विजेतेपद पटकावलं होतं. यापूर्वी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या तीन संघांनी डब्ल्यूटीसीचं विजेतेपद मिळवलं आहे. मात्र, दोनदा अंतिम फेरीत पोहोचलेल्या भारताला अद्याप ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही.

गुणतालिकेत भारत पाचव्या स्थानावर

डब्ल्यूटीसीच्या सध्याच्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. बांगलादेश चौथ्या स्थानावर असून भारत पाचव्या स्थानावर आहे. डब्ल्यूटीसीच्या नियमानुसार गुणतालिकेतील पहिल्या दोन स्थानांवर असलेले संघ अंतिम सामन्यात आमनेसामने येतात. त्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठायची असेल, तर उर्वरित सामन्यांमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागणार आहे.

Maharashtra TimesLovlina Borgohain : भारतासाठी गुड न्यूज! कॉमनवेल्थ गेम्सआधीच पदक पक्कं, बॉक्सर लवलीना थेट सेमीफायनलमध्ये, काय कारण?

भारतासमोर उरले ९ कसोटी सामने

भारताचे डब्ल्यूटीसीच्या सध्याच्या चक्रात अजून ९ कसोटी सामने बाकी आहेत. त्यापैकी ८ सामन्यांमध्ये विजय मिळवणं भारतासाठी महत्त्वाचं असल्याचं चित्र आहे. मात्र, हे आव्हान टीम इंडियासाठी सोपं असणार नाही. भारताला न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध त्यांच्या देशात कसोटी सामने खेळायचे आहेत. त्यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची मालिका होणार आहे.

दरम्यान, भारतीय कसोटी संघातही मोठे बदल झाले आहेत. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे नव्या खेळाडूंच्या साथीने भारताला डब्ल्यूटीसीच्या अंतिम फेरीत पोहोचण्याचं आव्हान पेलावं लागणार आहे.