Headlines

बुमराह नसतानाही शमीला डावलून आकिबला निवडलं, टीम इंडियाच्या निवडकर्त्यांनी थेट मेसेज दिला, शमीचं करिअरच संपलं?


Mohammed Shami News : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताने आकिब नबीला संधी दिली. या निर्णयानंतर अनुभवी मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Mohammed Shami Comeback Chances
शमी, बुमराह, निवडकर्ते
मुंबई : श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघाला जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. बुमराह या मालिकेला मुकणार असून त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज आकिब नबीची भारतीय कसोटी संघात निवड करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयानंतर सर्वात जास्त चर्चा रंगू लागली आहे ती म्हणजे अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या भविष्याची.

३५ वर्षीय शमीला पुन्हा एकदा कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय करिअर आता जवळपास संपल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने गेल्या काही काळापासून शमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला २०२३ नंतर एकदाही संधी मिळालेली नाही.

रणजीत ३७ विकेट्स आणि दमदार कामगिरी; तरीही संधी नाही

शमीची संघात निवड होत नसल्यामागे सुरुवातीला फिटनेस हे मुख्य कारण सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर त्याने सातत्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळून स्वतःची फिटनेस सिद्ध केली. मागील रणजी ट्रॉफी हंगामात त्याने ७ सामन्यांत तब्बल ३७ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. या काळात तीन वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची किमयाही त्याने साधली. तब्बल २३०.३ षटके टाकून त्याने आपल्या तंदुरुस्तीबाबत निवड समितीला ठोस संदेश दिला होता.

Maharashtra TimesNeel Patel : 15 वर्षीय वैभवला टक्कर देण्यासाठी कांगारुंनी 16 वर्षांचा घातक फलंदाज उतरवला, भारताशीही आहे नातं; कधी येणार आमने-सामने?

इतकेच नाही तर आयपीएल २०२६ मध्येही शमीने १३ सामन्यांत १२ विकेट्स टिपल्या होत्या. मात्र, एवढी चमकदार कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही.

आकिब नबीला मिळाली मोठी संधी

जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर निवड समितीने अनुभवी शमीऐवजी युवा आकिब नबीवर विश्वास दाखवला. जम्मू-काश्मीरच्या या स्टार वेगवान गोलंदाजाने सलग दोन रणजी हंगामांत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या निवडीची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती आणि अखेर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले.

शमीची आकडेवारी आजही अव्वल

मोहम्मद शमीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर ती आजही थक्क करणारी आहे. शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामने खेळताना २२९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. एकाच सामन्यात ९ विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.

Maharashtra TimesBen Stokes : क्रिकेटने प्रगती साधली, पण मद्यपानाची संस्कृती तशीच; बेन स्टोक्सचं मोठं वक्तव्य! स्वतःच्या आणि संघाच्या व्यसनावरही उघडपणे बोलला

एकदिवसीय क्रिकेटमध्येही शमीचा दबदबा राहिला आहे. १०८ एकदिवसीय सामन्यांत त्याने २०६ विकेट्स घेतल्या असून वनडे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो भारताचा एकमेव गोलंदाज आहे. तसेच १६ वेळा ४ विकेट्स घेण्याचाही मोठा विक्रम त्याच्याच नावावर जमा आहे.

दरम्यान, याच महिन्यात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘दुलीप ट्रॉफी’साठी East Zone संघात निवड झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीकडे आणि त्याच्या भविष्यातील पावलांकडे आता सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा