महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Bhandara farmer death: तुमसर तालुक्यातील सोदेपूर गावात शुक्रवारी दुपारी वीज पडून एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. रघुनाथ उईके (५५) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, भावाने थांबण्याचा सल्ला दिला असतानाही ते शेतात गेले होते. त्यांच्या अकाली निधनाने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, विशेषतः धाकट्या मुलाच्या लग्नापूर्वी ही घटना घडली.
मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर!
भंडारा जिल्ह्यात पावसाचे थैमान
भंडारा जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पावसाने हाहाकार माजला होता. परिसरात मुसळधार पावसामुळे सोदेपूर गावातही सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत दुपारी साधारण दोनच्या सुमारास रघुनाथ उईके शेतावर काम पाहण्यासाठी घराबाहेर पडले. वाटेत त्यांची भाऊ श्रावण उईके यांच्याशी त्यांची भेट झाली.
भावाचा सल्ला ऐकला नाही अन्…
पावसाचे आणि विजांचे वातावरण पाहून श्रावण यांनी रघुनाथला काही वेळ थांबून मग शेतावर जाण्याचा सल्ला दिला. परंतु, रघुनाथ यांनी “मी फक्त शेतातील पाणी तापासून लगेच परतेन” असे सांगून पुढे मार्गस्थ झाले. काही वेळातच आकाशात प्रचंड कडकडाट झाला आणि वीज कोसळण्याचा आवाज आला. विजेचा हा फटका थेट रघुनाथ यांच्यावर बसला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. दीड तासानंतर श्रावण शेतात भावाला भेटण्यासाठी गेले असता त्यांना रघुनाथ मृत अवस्थेत जमिनीवर पडलेले दिसले. धक्कादायक दृश्य पाहून त्यांनी तात्काळ कुटुंबीय व गावकऱ्यांना बोलावले. क्षणातच शेतात लोकांची गर्दी झाली आणि गावभर शोककळा पसरली.
मी त्यांच्याविषयी एवढं बोलू शकतो की घराबाहेर निघणं मुश्किल होईल, गिरीश महाजनांचं खडसेंना प्रत्युत्तर!
घटनेची माहिती मिळताच गोबरवाही पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. रघुनाथ यांना दोन मुले व दोन मुली आहेत. विशेष म्हणजे, त्यांच्या धाकट्या मुलाचा विवाह काही दिवसांत होणार होता. मात्र त्यांच्या अकाली मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावात दु:खाचे वातावरण निर्माण झाले आहे.
