Headlines

तलावांत केवळ २० टक्के पाणीसाठा, अर्धा पावसाळा उलटला; नागपूर जिल्ह्यात टंचाईची सावट कायम| Maharashtra Times


Nagpur Rain: नागपूर जिल्ह्यात जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे.

नागपूर पाणीटंचाई
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: जुलै महिना संपत आला, तरी जिल्ह्यातील पाणीटंचाईचे सावट अद्याप कायम आहे. अपेक्षित पाऊस न झाल्याने जिल्हा परिषदेच्या तलावांमध्ये आतापर्यंत केवळ २० टक्केच पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच काळात तलावांमध्ये सुमारे ६० टक्के पाणी उपलब्ध होते. त्यामुळे यंदा पावसातील खंडाचा परिणाम पिण्याच्या पाण्यावर जाणवू लागला आहे.

जिल्ह्यातील ३५ गावांत सध्या टंचाईसदृश परिस्थिती आहे. या गावांमध्ये विहिरी अधिग्रहित करून पाणीपुरवठा केला जात आहे. हिंगणा तालुक्यातील पेंढरी आणि काजळी या दोन गावांत अजूनही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. प्रत्येक गावासाठी एक टँकर धावत असून, ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी प्रशासनाला पर्यायी व्यवस्था करावी लागत आहे. यंदा अल निनोच्या परिणामामुळे मान्सूनची जोरदार हजेरी लागलेली नाही. जुलै महिन्यातील पाऊस शेतीसह पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भरून काढणारा मानला जातो. मात्र, यंदा जुलैमध्येही पावसाने अपेक्षित साथ दिलेली नाही. त्यामुळे शासनाने यापूर्वीच अल निनोच्या पार्श्वभूमीवर विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश दिले होते.

Maharashtra TimesWeather Update: हवामान विभागाचा टेन्शन वाढवणारा अंदाज जाहीर, महाराष्ट्रात जुलैअखेरीस सरासरीहून कमी पाऊस; ऑगस्टमध्ये स्थिती काय?

कुही तालुक्यातील १३ आणि नरखेड तालुक्यातील १४ गावांमध्ये स्थिती अधिक चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. आठवडाभरापूर्वी ५८ गावांत टंचाईसदृश स्थिती होती. त्यात काहीशी घट झाली असली, तरी पावसाचा खंड कायम राहिल्यास टँकर आणि अधिग्रहित विहिरींची संख्या पुन्हा वाढू शकते, असा इशारा पाणीपुरवठा विभागाने दिला आहे.

आठवडाभरात घटली नागपूरची चिंता

विदर्भात गेल्या आठवड्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे काही जिल्ह्यांतील पर्जन्यमानातील तूट कमी झाली आहे. नागपूर जिल्ह्यात आठवडाभरापूर्वी २७ टक्के तूट होती. ती आता १६ टक्क्यांवर आली असून, नागपूरवरील जलसंकटाची चिंता काहीशी कमी झाली आहे. मात्र, निम्म्या विदर्भात अद्याप पावसाची तूट चिंताजनक आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, २२ जुलैपर्यंत विदर्भातील एकूण पर्जन्यमानात २३ टक्के तूट आहे.

भंडारा, बुलढाणा आणि वर्धा जिल्ह्यांतील तूटही १९ टक्क्यांपेक्षा कमी आहे. गोंदियात सरासरीपेक्षा ९ टक्के अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली, वाशीम आणि यवतमाळमध्ये १९ टक्क्यांपेक्षा अधिक तूट आहे. गडचिरोलीत सर्वाधिक ३८ टक्के, वाशीममध्ये ३४ टक्के, अमरावती व चंद्रपूरमध्ये प्रत्येकी २९ टक्के, अकोल्यात २४ टक्के, तर यवतमाळमध्ये २० टक्के तूट नोंदली गेली. हवामान खात्यानुसार २४ ते ३० जुलैदरम्यान विदर्भात सरासरीइतका, तर ३१ जुलै ते ६ ऑगस्टदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता आहे.

सानिया कदम

लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.

पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.

यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.

२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.

लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.आणखी वाचा