Headlines

आईसह पाच मुलांचा विजापुरात बुडून मृत्यू


कौटुंबिक वादातून भुतनाळ तलावात आत्महत्या केल्याचा अंदाज : घटनेने सर्वत्र हळहळ

  त. भा. वार्ताहर

विजापूर : शहरातील आदर्शनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या भुतनाळ तलावात आईसह तिच्या पाच मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तोरवी शांतिनगर येथील शोभा जालगेरी (35 वर्षे) तसेच त्यांच्या मुली विद्या (15 वर्षे), सुवर्णा (13 वर्षे), सानिका (10 वर्षे) आणि मुलगा तिप्पराय (12 वर्षे), विकास (6 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी, 24 ऑगस्ट रोजी शोभा आणि तिची मुले बेपत्ता झाल्याची तक्रार विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. याप्रकरणी बेपत्ता प्रकरण क्रमांक 395/2026 नोंदविण्यात आले होते. शोभा यांचे पती मल्लिकार्जुन जालगेरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कौटुंबिक वादातून शोभा मुलांना घेऊन घरातून निघून गेल्या होत्या.

दरम्यान, शोभा आणि त्यांच्या पाचही मुलांचे मृतदेह बुधवारी भूतनाळ तलावात आढळले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेह तलावातून बाहेर काढून बीएलडीई रुग्णालयात पाठविले. या घटनेमागील नेमके कारण काय, याचा आदर्शनगर पोलीस तपास करत आहेत. या आत्महत्या प्रकरणामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत