देशातील काही भागांना मात्र या तुटीतून दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत. वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत; तसेच पूर्व द्वीपकल्पीय प्रदेशातील काही ठरावीक भागांमध्ये सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
आयएमडीचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी एका निवेदनात सांगितले, की जुलै महिन्यात देशातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, देशातील वायव्य आणि ईशान्य भारत, पूर्व-मध्य भारत आणि पूर्व द्वीपकल्पीय क्षेत्रातील काही भाग या ठिकाणी पाऊस सामान्य किंवा सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज आहे. दीर्घकालीन सरासरी म्हणजे, एखाद्या विशिष्ट प्रदेशात ठरावीक कालावधीत नोंदवलेल्या पावसाची आकडेवारी असते.
दिवसभर संततधार
मुंबईमध्ये मंगळवारी ‘ऑरेंज ॲलर्ट’ देण्यात आला होता. दिवसभरात मुंबईमध्ये संततधार होती. सकाळी ८.३० ते सायं. ५.३० या कालावधीत कुलाबा येथे २५.४, तर सांताक्रूझ येथे १४.१ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. महामुंबई परिसराचा ऑरेंज ॲलर्ट ४ जुलैपर्यंत कायम ठेवण्यात आला आहे.
पावसाने कोकणात जोर धरला असला तरी यंदाच्या जूनमध्ये या विभागामध्ये पावसाची तूट आहे. मुंबई शहराने सरासरीची श्रेणी गाठली आहे, मात्र कोकण विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट नोंदली गेली आहे. या पार्श्वभूमीवर जुलैमधील पहिल्या १० दिवसांमध्ये पाऊस दिलासा देईल, अशी भारतीय हवामान विभागाने केलेली घोषणा महत्त्वाची आहे. कोकण विभागात ४ जुलैपर्यंत काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई शहरामध्ये १ जून ते ३० जून या कालावधीत ४४१.१ मिलीमीटर, तर मुंबई उपनगरामध्ये ४१६.४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. मुंबई शहरातील पाऊस सरासरीपेक्षा १९ टक्क्यांनी कमी, तर उपनगरांतील पाऊस सरासरीपेक्षा २२ टक्क्यांनी कमी नोंदला गेला. शहरामध्ये १९ टक्क्यांची तूट असल्याने हा पाऊस सरासरीच्या श्रेणीत असल्याची नोंद झाली, तर उपनगरांमध्ये मात्र तूट असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले.
कोकण विभागात ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त तूट नोंदली गेली. ठाणे जिल्ह्यात केवळ ११६.६ मिलीमीटर पाऊस पडला असून, ठाणे जिल्ह्यात ७५ टक्के तूट नोंदली गेली.
आज मुसळधार ते अतिमुसळधार
मुंबईमध्ये आज, १ जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकेल. ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी – मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याने ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. २ जुलैपासून पावसाचा जोर आणि व्याप्ती वाढेल. २ जुलैला पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गला ऑरेंज, तर रायगडला रेड अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी अति तीव्र मुसळधार पावसाची शक्यता आहे. महामुंबईत ३ आणि ४ जुलै रोजी तुरळक ठिकाणी अतितीव्र मुसळधार पाऊस पडेल.
पुण्यात जूनमध्ये केवळ ६४ मिलीमीटर
पुण्यात जूनच्या सरासरीच्या निम्मादेखील पाऊस पडला नाही. शहरात एक ते ३० जूनदरम्यान केवळ ६४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पावसाचा हंगाम सुरू होऊनही २० जूनपर्यंत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या नोंदवहीत पावसाच्या रकान्यासमोर शून्य आकडा लिहिलेला होता.
Maharashtra Rain Update : 2 ते 4 जुलै तुफान पाऊस पडणार, हवामान विभागाकडून महत्त्वाचा अलर्ट जारी
नाशिकमध्ये हलक्या सरी
शहरात मंगळवारी दुपारनंतर पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावत नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दिला. शहरात हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्या, तर काही उपनगरांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चार तासांत सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत शहरात ७.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
सातपूर, सिडको, कॉलेजरोड, सीबीएस, पंचवटीसह नाशिकरोड, अंबड परिसरात मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. कामावरून घरी परतणाऱ्या नागरिकांना वाहतुकीचा वेग मंदावल्याचा अनुभव आला. हवामान विभागाने नाशिक जिल्ह्यासाठी पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला आहे.

