Headlines

खरंच मित्रासोबत जेवायला ज्या हॉटेलवर गेले तिथे धाड टाकली होती का? तुकाराम मुंढेंनी सांगितलं व्हायरल कहाणीतलं सत्य


तुकाराम मुंढे यांना त्यांचा मित्र जबरदस्ती रेस्टॉरंटमध्ये जेवणासाठी घेऊन गेला. संबंधित रेस्टॉरंटमध्ये नियमांचे उल्लंघन होत असल्याचं तुकाराम मुंढे यांच्या निदर्शनास आलं. मुंढे यांनी रेस्टॉरंटच्या मॅनेजमेंटला याबाबत समज दिली. यानंतर 24 तासांचा वेळ दिला होता, असा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला.

Tukaram Mundhe
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे हे कडक शिस्तीचे अधिकारी आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस अन्न मिळणं आवश्यक आहे. त्यामुळे सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, खाणावळ अशा सर्व ठिकाणी अन्न सुरक्षा नियामांचे पालन केले जात आहे ना? याची तपासणी तुकाराम मुंढे यांच्या अधिकाऱ्यांकडून राज्यभरात केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्याकडून राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विविध हॉटेल्समध्ये छापा टाकून कारवाई केली जात आहे. विशेष म्हणजे मंत्रालायचे कॅन्टीन पासून ते मुंबई हायकोर्टाचे कॅन्टीनचीदेखील तुकाराम मुंढे यांच्या विभागाने तपासणी केली. त्यांच्या या कारवाईंबाबतचा एक मजेशीर किस्सा त्यांनी शेअर केला आहे.

तुकाराम मुंढे एका मित्रासोबत रेस्टॉरंटला जेवणासाठी गेले होते. पण दुसऱ्या दिवशी त्याच रेस्टॉरंटवर एफडीएची धाड पडली होती, अशी चर्चा नेहमी होत असते. याचबाबत तुकाराम मुंढे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपली भूमिका मांडली.

तुकाराम मुंढे काय म्हणाले?

“संदर्भ बरोबर आहे. पण त्याबातची चर्चा चुकीची आहे. त्याबाबतचे तथ्य वेगळे आहेत. संबंधित रेस्टॉरंटमध्ये जाण्याआधीच आम्ही अशा अनेक कारवाया केल्या होत्या. तसेच या विभागात बदली झाल्यानंतर मी या विभागाची माहिती जाणून घेतली. या विभागाचे नेमके काम काय आणि भूमिका काय आहे, हे जाणून घेतलं. माझ्या अधिकाऱ्यांची जबाबदारी काय ते कसे कारवाई करतील या सगळ्या गोष्टींचा मी अभ्यास केला. प्रत्येक विभागाचे एक व्हिजन असते. तसे आमच्या विभागाचे व्हिजन आहे”, असं तुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.

मित्राने बाहेर जेवणासाठी आग्रह केला

“आम्ही सुरुवातीला प्रतिबंधित वस्तूंच्या विरोधात कारवाई सुरु केली. एकदा माझ्या मित्राने मला बाहेर जेवणासाठी बोलावलं. मी सांगितलं की, मी अन्न सुरक्षा आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत असल्याने तिथे जेवायला येणं हे बरोबर वाटणार नाही. कारण मी रेस्टॉरटला गेलो तर मी तिथे आजूबाजूला पाहतो. मला तिथल्या अन्नाची चव घ्यायची नाही. त्यामुळे मी न आलेलो बरा, असं सांगितलं”, असं मुंढे म्हणाले.

“मित्राने आग्रह केला की, संबंधित रेस्टॉरंट खरंच खूप चांगलं आहे. मी सांगितलं की, परत एकदा विचार कर. कारण उद्या काही घडलं तर ते रेस्टॉरंटवाले तुझ्यावर ब्लेम करतील, माझ्यावर नाही. तर ते म्हणाले, नाही तुम्ही या. मी संबंधितांना काळजी घेण्यास सांगेन. त्यामुळे मी म्हटलं की ठिक आहे”, असं तुकाराम मुंढे म्हणाले.

रेस्टॉरटमध्ये प्रवेश करताच नियमांचं उल्लंघन झाल्याचं आलं लक्षात

“मी तिथे कार्यालयीन कामकाजांनंतर रात्री साडे आठ ते नऊ वाजेच्या सुमारास गेलो. मी आत शिरताच सर्वप्रथम लक्षात आलं की, रेस्टॉरंटचा परवाना ठळक आणि सहज दिसेल अशा ठिकाणी प्रदर्शित करणे आवश्यक असतानाही तो तिथे लावलेला नव्हता. पण मी तिथे काही बोललो नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे पाण्याच्या बोटल विकत मिळत होत्या. पिण्याच्या पाण्याची मोफत सुविधा नव्हती. तुम्ही मागणी केली तर ते पाण्याची बॉटल देत. त्यानंतर आमच्यात गप्पा झाल्या”, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं.

पनीर ऑर्डर न करण्याचा सल्ला दिला

“माझा मित्र पनीर ऑर्डर करत होता. मी त्याला सल्ला दिला की, पनीरची ऑर्डर नको देऊस. कारण खरं पनीर असण्याची शक्यता कमी आहे. त्यावर त्यांनी रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांना हे खरं पनीर आहे ना की अॅनलोग पनीर आहे, याची विचारपूस केली. त्यावर रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांनी हे खरं पनीर असल्याचा दावा केला. मी पुन्हा विचारलं की खरंच ते पनीर आहे? ते हो म्हणाले”, असं मुंढे म्हणाले.

पनीर खरं नव्हतं, मॅनेजमेंटला समजवलं, 24 तास सुधारण्यासाठी दिले

“पनीर जसे टेबलावर आले तेव्हा मी माझ्याकडे घेतलं आणि चेक केलं. मी विचार केल्याप्रमाणे ते खरे पनीर नव्हतेच. खरं पनीर ओळखण्यासाठी काही विशेष क्लृप्ती नाही. ते किती मऊ आहे, अशा काही टेक्निकल गोष्टी आहेत. मी त्यांना सांगितलं की, नका खाऊ. तर मित्राने ते नाही खाललं. त्यावेळी मी संबंधित रेस्टॉरंटच्या मॅनेजमेंटला सांगितलं की, तुम्ही या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्या सुधारुन घ्या. इतकं सांगून मी काहीच केलं नाही. यानंतर 24 तासांनी मी इतरांना तिथे जाऊन नियमांचे पालन केले आहे का? याची चाचपणी करण्यासाठी पाठवले. त्यांना नियमांचे पालन करण्यासाठी 24 तासांचा वेळ दिला होता. त्यानंतर आम्ही तपासणी केली”, असा किस्सा तुकाराम मुंढे यांनी सांगितला.