बहुतांश मध्यमवर्गीयांप्रमाणे तिचे आयुष्य सुखवस्तू आणि तरीही एकसुरी होते. तोचतोपणा हा तिच्या आयुष्याचा स्थायीभाव होता. त्याच वेळी आध्यात्मिक उन्नतीसाठीही ती प्रयत्नशील होती. काही काळापूर्वीच तिने एका सत्पुरुषांकडून दीक्षा घेतली होती. सत्संग – श्रवण, पारायण, सश्रद्ध मनोभूमिका ती हळूहळू विकसित करण्याचा मनःपूर्वक प्रयत्न करत होती.
आयुष्यात मिळणारी अनुकूलता, व्यावहारिक अडचणींमधून मिळणारा मार्ग ही आपल्या गुरूंचीच कृपा आहे, असा तिचा मनीचा प्रामाणिक भाव होता. त्यांनी सांगितलेली साधना करता करता आपल्याला अतींद्रिय, उत्कट आध्यात्मिक अनुभव यावेत, अशी मनोमन प्रार्थना ती देवाकडे, गुरूंकडे करीत असे…
कित्येक वेळा व्यावहारिक आयुष्यातील पोकळी आध्यात्मिक आकांक्षांच्या पूर्तीने भरून काढण्याचा मानवी मनाचा प्रयत्न असतो. संत-सत्पुरुषांची चरित्रे, साक्षात्कारी व्यक्तींचे विशेष आध्यात्मिक अनुभव – दिव्य नादश्रवण, दर्शन, सगुण साक्षात्कार, वेगवेगळ्या सिद्धी, सामर्थ्यप्राप्ती यांची वर्णने वाचून साधकमन अतिशय प्रभावित होते. अशा दिव्य, अद्भुत अनुभूती आपल्याला देखील मिळाव्यात याची वाढती उत्कंठा आणि तसे होत नसल्यास येणारी अस्वस्थता, कित्येक वेळा या उत्कंठेतून मनाने स्वयंसूचनेतून निर्माण केलेल्या अनुभवांचे आभास, सामान्य गोष्टींमध्ये चमत्कार शोधण्याची प्रवृत्ती, त्यांचे कौतुक हेच आध्यात्मिक जीवन होऊन बसण्याची शक्यता असते.
खरी आध्यात्मिक साधनेची मार्गक्रमणा अशा अद्भुततेच्या मागे जाणारी नसते. स्वतःमधील ईश्वरतत्त्वाच्या अनुभवासाठी अंतःकरण पवित्र राखणे, अंतर्बाह्य शुचिता राखणे आणि ईश्वराचा अखंड स्पर्श अनुभवत प्रसन्नतेचा प्रसाद घेणे हे अध्यात्माचे अंतरंग आहे.
आता, अद्भुत अनुभवांचा हट्ट धरणे आणि अमुक एक प्रकारेच माझी प्रगती झाली पाहिजे ही मनोभूमिका, गुरूंच्या ठिकाणी शरणागतीला विसंगत आहे हे तिला उमजले आहे. आता, या क्षणी आनंदात आणि अनुसंधानात राहणे हेच तिचे कर्तव्य झाले आहे.

