West Indies 2027 World Cup Qualification : वेस्ट इंडिज पुन्हा वनडे वर्ल्डकपमधून बाहेर पडणार का? अफगाणिस्तानच्या विजयामुळे दोन वेळच्या विश्वविजेत्याची थेट पात्रता जवळपास संपुष्टात आली असून आता पुढचा मार्ग कठीण झाला आहे.

अफगाणिस्तानच्या एका विजयाने इंडिजला धक्का
२०२७चा वनडे वर्ल्डकप दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे होणार आहे. यजमान दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना थेट स्थान मिळाले आहे. उर्वरित आठ जागा आयसीसी वनडे रँकिंगच्या आधारे निश्चित होणार आहेत.
यासाठी ३० सप्टेंबर २०२६ ही कट ऑफ तारीख आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेनंतर वेस्ट इंडिज ७३ गुणांसह दहाव्या स्थानावर आहे. दुसरीकडे अफगाणिस्तान ९० गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
Mumbai T20 League : आता मुंबई टी-२० लीगमध्ये ९ संघ! MCAनं नव्या टीमसाठी निविदा मागवल्या, कोणत्या खेळाडूंना मिळणार संधी?
अफगाणिस्तानने आयर्लंडला दुसऱ्या वनडेत ९२ धावांनी पराभूत केले. राशिद खानने या सामन्यात ३६ धावा देत सहा विकेट्स घेतल्या. या निकालामुळे वेस्ट इंडिजसाठी थेट पात्रतेचा मार्ग आणखी कठीण झाला आहे.
२०२३मध्येही वर्ल्डकपला मुकले होते
वेस्ट इंडिजची ही परिस्थिती पहिल्यांदाच निर्माण झालेली नाही. २०१९च्या वर्ल्डकपसाठीही त्यांना थेट पात्र होता आले नव्हते. त्यानंतर २०२३मध्ये तर त्यांना वर्ल्डकपमध्ये प्रवेशच मिळवता आला नाही.
झिम्बाब्वेमध्ये झालेल्या क्वालिफायरमध्ये सुपर सिक्स टप्प्यात वेस्ट इंडिजला झिम्बाब्वेकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर स्कॉटलंडविरुद्ध विजय मिळूनही त्यांचे वर्ल्डकपचे स्वप्न पूर्ण झाले नाही.
भारताविरुद्धची मालिका निर्णायक ठरणार?
वेस्ट इंडिजला आता भारताविरुद्ध तीन वनडे सामने खेळायचे आहेत. या मालिकेला २७ सप्टेंबरपासून सुरुवात होईल. दुसरा सामना ३० सप्टेंबर, तर तिसरा सामना ३ ऑक्टोबरला होणार आहे.
मात्र, भारताविरुद्ध ३-० असा विजय मिळवला तरी वेस्ट इंडिजची थेट पात्रता निश्चित होईलच असे नाही. कट ऑफपर्यंतची रँकिंग आणि इतर संघांचे निकालही महत्त्वाचे ठरणार आहेत.
दोन वेळचा चॅम्पियन पुन्हा क्वालिफायर खेळणार?
वेस्ट इंडिजने वनडे वर्ल्डकपच्या सुरुवातीच्या काळात आपला दबदबा निर्माण केला होता. १९७५ आणि १९७९मध्ये त्यांनी सलग दोन विजेतेपदं मिळवली. मात्र, १९८३मध्ये भारताने त्यांचा पराभव केल्यानंतर त्यांना पुन्हा वनडे वर्ल्डकप जिंकता आलेला नाही.
आता परिस्थिती इतकी बदलली आहे की दोन वेळचा विश्वविजेता थेट वर्ल्डकपसाठी पात्र होण्यासाठीही संघर्ष करत आहे. त्यामुळे २०२७मध्ये वेस्ट इंडिज थेट खेळणार की पुन्हा एकदा क्वालिफायरच्या मार्गाने जावे लागणार, याकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले आहे.

