Yami Gautam On Bollywood : अभिनेत्री यामी गौतमच्या नावे नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहिर झाला. पण तिच्या आयुष्यात एक काळ असाही होता जेव्हा तिने खचून बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता.

‘विकी डोनर’नंतर चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या एका मुलाखतीत यामीने सांगितले की, 2012 मध्ये ‘विकी डोनर’ या चित्रपटातून तिने पदार्पण केले होते. हा सिनेमा चांगलाच गाजला. विकी डोनर या सिनेमात आयुष्मान खुरानाची प्रमुख भूमिका होती. या सिनेमामुळे त्याचे करियर उच्च शिखराला जाऊन पोहचले पण यामीला मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. तिला अनेक वर्षे चांगल्या भूमिका मिळाल्या नाहीत. यामुळे निराश होऊन तिने हिमाचल प्रदेशला परत जाण्याची तयारीही केली होती. तिने नमूद केले की, बॉलिवूडमधील लोक तिला इतर नायिकांच्या नजरेतून पाहत नसत आणि याचा परिणाम तिच्या कारकिर्दीवर झाला.
‘मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता’
यामी म्हणाली, “उरी आणि बाला या चित्रपटांपूर्वी मी बॉलीवूड सोडण्याचा निर्णय घेतला होता. मी हिमाचलत परत जाण्याचे ठरवले होते. तिथे आमची शेतजमीन आहे आणि तिथेच नवीन आयुष्य सुरू करण्याचा माझा विचार होता. माझ्या पालकांनी मला या निर्णयासाठी पूर्ण पाठिंबा दिला आणि घरी परतण्यास सांगितले; पण ज्या क्षणी मी या क्षेत्राबद्दलची भीती मनातून काढून टाकली, त्या क्षणी सर्व काही बदलले. मला उरी आणि बाला हे चित्रपट मिळाले आणि माझे आयुष्य एका रात्रीत बदलून गेले.”
‘स्टार किड्स’बद्दल मोकळेपणाने भाष्य
यामी गौतमने चित्रपटसृष्टीत आउटसाइडर व्यक्ती म्हणून आलेल्या आपल्या अनुभवांबद्दलही सांगितले. तिने नमूद केले की, ‘स्टार किड्स’ना वारंवार संधी मिळतात, तर बाहेरून आलेल्या कलाकारांना केवळ एक चांगली संधी मिळवण्यासाठीही दीर्घकाळ संघर्ष करावा लागतो.
मला प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागायचं…
अभिनेत्री म्हणाली, “केवळ आऊटसाइडर असणं हीच काही एकमेव अडचण नव्हती; तर प्रत्येक वेळी स्वतःला सिद्ध करावं लागणं हे जास्त आव्हानात्मक होतं. असे काही क्षण असायचे जेव्हा मी एखाद्या भूमिकेसाठी पूर्णपणे सज्ज असायचे, तरीही तीच संधी वारंवार दुसऱ्या कोणालातरी मिळायची; कारण ती व्यक्ती आधीपासूनच या इंडस्ट्रीचा भाग होती. त्या काळात हीच गोष्ट सर्वात जास्त निराशाजनक वाटायची.”
इंड्रस्ट्रीतल्या पक्षापातामुळे निराशा…
एका मुलाखतीत यामीने खुलासा केला की, तिला चित्रपटसृष्टीत पक्षपाताचा सामना करावा लागला होता, त्यामुळे तिला खूप दुःख झाले होते. तिने सांगितले की, अनेकदा चित्रपटांबाबतच्या चर्चा अचानक थांबवल्या जायच्या आणि कोणतेही स्पष्ट कारण नसताना हातातून संधी निसटून जायच्या. यामीला वाटते की काळानुसार परिस्थितीत खूप बदल झाला आहे. ती म्हणाली, “आजच्या प्रेक्षकांना या गोष्टीशी काही देणेघेणे नसते की तुम्ही कुठून आला आहात. ते फक्त हे पाहतात की तुम्ही कसे कलाकार आहात आणि तुमचा चित्रपट पाहण्यासारखा आहे की नाही? प्रेक्षकांचा हा विश्वास पुढच्या पिढीसाठी मोठी आशा निर्माण करतो.”
यामी गौतम या चित्रपटात अखेरची दिसली होती
यामी गौतमच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती शेवटची ‘हक’ या चित्रपटात इम्रान हाश्मीसोबत दिसली होती. हा चित्रपट 7 नोव्हेंबर 2025 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला होता, परंतु बॉक्स ऑफिसवर त्याला विशेष यश मिळाले नाही. सध्या हा सिनेमा नेटफ्लिक्सवरवर उपलब्ध आहे. त्यानंतर, अलीकडेच यामीने ‘धुरंधर 2’ या ब्लॉकबस्टर चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. तिचा तो कॅमिओ रोल पाहूनही प्रेक्षक खूप खुश झाले.
यामी गौतमचा आगामी चित्रपट
यामी गौतम लवकरच ‘नई नवेली’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक ‘हॉरर-कॉमेडी’ चित्रपट असून प्रेक्षक याची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा चित्रपट ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे, मात्र रिलीजची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
‘आर्टिकल 370’ साठी यामी गौतमला राष्ट्रीय पुरस्कार
यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ या चित्रपटाला नुकताच 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म’चा बहुमान मिळाला आहे. यासोबतच, या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी यामी गौतमला ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’चा राष्ट्रीय पुरस्कारही जाहिर करण्यात आला. मिळालेल्या या यशानंतर, यामीने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर केली. तिने लिहिले की, हा तिच्यासाठी अत्यंत खास क्षण आहे आणि हे एक असे स्वप्न होते जे तिने अनेक वर्षांपासून आपल्या हृदयात जपले होते. या सन्मानाबद्दल यामीने आपली संपूर्ण टीम, कुटुंब आणि प्रेक्षकांचे आभार मानले.

