पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जितेंद्र डुडी म्हणाले की, “देहू आणि आळंदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्यामुळे देहू आणि आळंदीला जाणे टाळा. पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी पुणे महापालिका हद्द किंवा त्यापुढे सहभागी व्हावे. इंद्रायणी नदीतून ८ हजार क्यूसेक ; पवना नदीतून १० हजार क्युसेक विसर्ग सुरू. पाऊस सुरू राहिला तर आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी खडकवासला धरणातून १० क्यूसेक विसर्ग करावा लागेल.”
दरम्यान, “जिल्ह्यातील विविध घटनांमध्ये वीस लोक जखमी झाले आहेत. दोन दिवसांत पाच जणांचा मृत्यू झाला असून रेड किंवा ऑरेंज अलर्ट असेल तर जिल्ह्यातील किल्ले आणि पर्यटन स्थळ बंद राहतील. जिल्ह्यात २२ भूस्लखन, दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. तसंच जिल्ह्यातील नऊ रस्ते बंद करण्यात आले आहेत. दोन दिवसात २०० मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे,” अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
लोणावळ्यासह मावळात आभाळ फाटलं, संपूर्ण मावळात जलप्रलय
लोणावळ्यासह मावळातील सर्वच रस्ते, अनेक पूल पाण्याखाली गेले संपूर्ण मावळाचा संपर्क तुटला आहे. महाराष्ट्रासह देशाची दळणवळण गंगा संबोधल्या जाणाऱ्या मुंबई पुणे द्रुतगती व जुना मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह वाहू लागल्याने वाहतूक ठप्प होती, तसेच काही वाहने वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मिसिंग लिंक मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे आलेला मोठ्या प्रमाणातील मलबा, सिमेंटा खांब, एक टन वजनाचा एक भला मोठा दगड कोसळल्याने मिसिंग लिंकचीही वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई पुणे लोहमार्गावर खंडाळा घाटात सहा ते सात ठिकाणी लोहमार्गावर दरडी कोसळण्याच्या घटनांनी रेल्वे वाहतूकही ठप्प झाल्याने मुंबई पुणे लोकलसह अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली होती.
मळवली जवळील व विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण तालुक्यातील एक घर दरडीच्या खाली गडप झाल्याने या घरातील तिघांचा मृत्यू झाला आहे. लोणावळ्यात मागील २४ तासांत ६२५ तर पवना धरण पाणलोट ३४२ क्षेत्रात मिलीमीटर पावसाची नोंद, तर मावळातील सर्वच जलाशयांच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली असून, काही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने त्यांच्यातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. लोणावळ्यातील टाटाचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणातील पाण्याचा प्रवाह इंद्रायणी नदीच्या पात्रात आल्याने लोणावळ्यात इंद्रायणी नदी काठी असलेल्या हुडको कॉलनी परिसराला पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, येथील अनेक घरे १० ते १२ फुटांपर्यंत पाण्यात गेली आहे.
मावळ तालुक्यातील बहुतांश रस्ते, पुल पाण्याखाली गेल्याने तालुक्याचा संपर्क तुटला. सर्व नद्या,नाले व ओढ्यांना महापूर आला आहे. तालुक्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळित झाले आहे. वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे. पाटण गावासह धालेवाडी, लोहगड, लोणावळ्यातील हनुमान टेकडी जवळ, पवन मावळातील जवण गावच्या हद्दीसह इतर काही ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.
भांगरवाडी, नांगरगाव, वलवण भागात ५ ते ७ फुटांपर्यंत पाण्याची पातळी वाढली होती. अनेक घरांमध्ये, सोसायटी व बंगल्यात पाणी घुसले तर लोणावळा ग्रामीण परिसरातील कुसगाव बुद्रुक हद्दीतील दत्तवाडी, यशवंत नगर, भैरवनाथ नगर, कुसगाववाडी, ओंढे रोड, क्रॉंक्रीट इंडिया, वेताळवाडी, डोंगरगाव याभागात ४ ते ५ फुटांपर्यंत पाणी साचल्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी घुसल्याने अनेकांच्या संसार पाण्यात गेले आहेत.
विशेषतः मळवली परिसराला समुद्राचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या परिसरातील काही बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यापर्यंत पाणी गेले होते. ठिक ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या रहिवाशांना, पर्यटकांना लोणावळ्यातील शिवदुर्ग मित्र आणि मावळ वन्यजीव संरक्षण संस्थेच्या आपत्कालीन पथकाने सोमवारी पहाटेपासूनच जिवाची पर्वा न करता सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहे.

