Headlines

सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रात सुसूत्रता:सुहास पटवर्धन यांचे मत, सहकार सप्ताहाच्या समारोपात प्रतिपादन




भारत सरकारने ६ जुलै २०२१ रोजी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे सहकार क्षेत्रातील विविध विभागांमध्ये सुसूत्रता आली आहे. यामुळे अधिकाधिक नागरिकाभिमुख निर्णय घेतले जात आहेत, असे मत महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी व्यक्त केले. केंद्रीय सहकार मंत्रालयाला २०२६ मध्ये पाच वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यातर्फे २९ जून ते ६ जुलै २०२६ या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप बाणेर रस्त्यावरील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे झाला, त्यावेळी पटवर्धन बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पर्यावरण अभ्यासक श्यामला देसाई, निवृत्त जनरल विजय पवार, चैतन्य पुरंदरे, सुनील जोशी, विवेक वेलणकर, महाराष्ट्र हौसिंग अँड अपार्टमेंट फेडरेशनचे माजी अध्यक्ष सुहास ढवळे, अजित चौघुले, उपाध्यक्ष सुभाष कर्णिक, सचिव मनीषा कोष्टी आणि मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमसुद्दीन तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहकार विशेषांकाचे प्रकाशनही करण्यात आले. पटवर्धन म्हणाले की, सहकारांतर्गत केवळ गृहनिर्माण संस्थांचा विचार केला तरी त्यात मोठे काम आहे. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे जुने आणि जटील नियम कालबाह्य करून नियमांत लवचिकता आणली आहे. गृहनिर्माणाशी संबंधित अनेक अधिकार सभासद आणि समिती सदस्यांना देण्यात आले आहेत. प्रशिक्षणाचे अनेक कार्यक्रम राबविण्यात येत असून, गृहनिर्माण संस्थांशी संबंधित सभासदांना थेट लाभ मिळेल अशी त्यांची रचना आहे. सहकार आणि सरकार यांच्यात संवाद सेतू उभारला गेला असून कार्यपद्धती अधिक पारदर्शक झाली आहे. युवा सहकार संस्थेच्या माध्यमातून युवकांना सहकार चळवळीशी जोडण्याचे पहिले पाऊल उचलले गेले असून, समाजाच्या तळागाळातील सर्व जाती-धर्माच्या लोकांना यात सहभागी करून घेतले जात आहे. यावेळी राज्याचे कॅबिनेट सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दृक्श्राव्य पद्धतीने उपस्थितांशी संवाद साधला. सहकार मंत्रालयाच्या स्थापनेमुळे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी पाच वर्षांत सहकार तळागाळात रुजवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जातील, असे पाटील यांनी सांगितले. सहकाराच्या माध्यमातून समृद्धीकडे वाटचाल होईल, असे निर्णय घेण्यात येतील, असेही ते म्हणाले.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत