Headlines

Road Collapsed in Malshej Ghat National Highway 61 Closed


माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झालेली नाही. पण वाहनचालकांच्या सुरक्षेसाठी या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. प्रशासनाकडून पर्यायी मार्गाने वाहतुकीचं आवाहन करण्यात आलं आहे.

Malshej Ghat
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : कल्याण – अहिल्यानगर राष्ट्रीय महमार्गावर माळशेज घाटात रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेत सुदैवाने कोणीही जखमी झालेलं नाही. पण ही घटना अतिशय चित्तथरारक अशी आहे. माळशेज घाटात रस्ता खचल्याची दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत. माळशेज घाटात करणजाळे गावाजवळ ही रस्ता खचल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर माळशेज घाटात एकेरी वाहतूक सुरु होती. पण ही वाहतूक केवळ छोट्या वाहनांसाठी सुरु होती. एसटी बस, ट्रक, टेम्पो इत्यादी अवजड वाहनांना या मार्गाने जाण्यास बंदी घालण्यात आली होती. पण भूस्खलन गंभीर स्वरुपाचे असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्याचं वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिलं आहे. या मार्गावरील वाहतूक पनवेल मार्गाने वळवण्यात आली आहे.

माळशेज घाटात रस्ता कोसळल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण घटनास्थळी दाखल झालं. संबंधित प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. रस्ता तब्बल 5 ते 6 फूट खोल खचला आहे. तसेच 100 मीटरपर्यंतचा रस्ता खचला आहे. यामुळे संभाव्य धोका लक्षात घेत प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकेरी वाहतूक सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला. तसेच अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली. तसेच या मार्गाची वाहतूक पनवेलच्या दिशेला वळवण्यात आली. आता सर्व प्रकारच्या वाहनांना या मार्गाने जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.

प्रशासनाकडून या पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन

दरम्यान, पुढील आदेशापर्यंत माळशेज घाट हा वाहतुकीसाठी बंद असल्याचं प्रशासाने म्हटलं आहे. प्रशासनाकडून इतर मार्गाने वाहतूक करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रशासनाकडून आता आळेफाटा–राजगुरुनगर–चाकण–ताळेगाव एमआयडीसी–लोणावळा– मुंबई किंवा आळेफाटा–संगमनेर–नाशिक–कसारा–कल्याण–मुंबई या पर्यायी मार्गांनी प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

घाट माथ्यावर वाहनचालकांनी काळजी घ्यावी

राज्यात सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. घाट माथ्यावर तर मुसळधार ते अतिमुसळधार स्वरुपाचा पाऊस पडतो. माळशेज घाटातही मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे घाट माथ्यावरील वातावरणात खूप बदल झालेला असतो. अनेकदा घाट माथ्यावरच्या रस्त्यांवर धुकं पसरलेलं असतं. तसेच मुसळधार पाऊस देखील पडतो. अशावेळी वाहनचालकांपुढील चॅलेंज मोठं असतं. वाहनचालकांना यावेळी रस्ता दिसेनासा होतो.

अशावेळी गाडी चालवणं हे मोठं आव्हानात्मक होतं. अशावेळी दुर्घटना घडण्याची देखील भीती असते. त्यामुळे पावसाळ्यात अशा घाटमाथ्यावरुन प्रवास करणं टाळलं पाहिजे. अनेक जण माळशेज घाटात पावसाळी सहल म्हणून जातात. घाटात कुठेतरी थांबतात आणि सेल्फी काढतात. काही जण घाटात धबधबा बघून गाडी बाजूला लावतात आणि तिथे सेल्फी काढण्यासाठी थांबतात. पण असं कृत्य जीवावर बेतू शकतं.