जानकी आणि माझ्यात बरंच साम्य आहे. फक्त ती माझ्यापेक्षा थोडं कमी उपरोधिक बोलते, वागते. मी स्वतः दोन मुलांची आई असल्यानं त्यांच्याशी वागताना विशिष्ट शिस्त आणि प्रेम यांचा समतोल ठेवते. जानकीमध्येही तेच दिसतं. त्यात एक खास पुणेरी बाज आहे, जो दिग्दर्शक वरुण नार्वेकरनं माझ्याकडून करून घेतला. एक आई मुलांना समजून घेत असतानाच गरज पडल्यास शिस्तही लावते, तशीच जानकी आहे. त्यामुळे ही व्यक्तिरेखा साकारताना मला फार अभिनय करावा लागला नाही.
कलाकृतीत सासू-सुनेचं अनोखं नातं वेगळ्या पद्धतीनं दाखवलं आहे; या नात्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन कसा आहे ?
माझ्या घरी दोन मुलगे आहेत. भविष्यात त्यांच्या आयुष्यात कोण येईल, ते कसं आयुष्य जगतील, तेव्हा माझी भूमिका काय असेल, हे मला अजून ठाऊक नाही. पण माझी मुलं नेहमी म्हणतात की, ‘तू सुनेचीच बाजू घेशील.’ त्यांचं हे बोलणं ऐकून मला हसू येतं. मी माझ्या आईला सासू म्हणून पाहिलं आहे. तिचं आणि माझ्या वहिनींचं नातं खूप सुंदर आहे. त्यामुळे मला वाटतं, मीही चांगली सासू होऊ शकेन. मात्र आई आणि मुलगा यांच्यातील नातं, त्यात येणाऱ्या भावना, कधी निर्माण होणारी स्पर्धा किंवा असुरक्षितता याबद्दल मी आजच काही ठामपणे सांगू शकत नाही.
आजच्या काळात नातेसंबंधांवर आधारित कथा मोठ्या पडद्यावर कमी का दिसतात ?
करोनानंतर प्रेक्षकांच्या कलाकृती पाहण्याच्या सवयी बदलल्या आहेत. आज लोक थिएटरमध्ये जातात, तेव्हा त्यांना मोठा अनुभव हवा असतो. अॅक्शन, हॉरर, फँटसी किंवा भव्य दृश्यरचना याकडे त्यांचा कल वाढला आहे. नातेसंबंधांवर आधारित, वास्तववादी कथा ते घरी बसून ओटीटीवर पाहणं पसंत करतात. कारण अशा कथा त्यांच्या जवळच्या असतात. त्यामुळे त्या घरच्या वातावरणात पाहणं अधिक सोयीचं वाटतं. त्यामुळेच मराठी झी फाइव्हवरील ‘अगं आई, अहो आई‘ सारख्या संवेदनशील कथा ओटीटीवर अधिक प्रभावीपणे पोहोचतात.
महिलाकेंद्री कथांमध्ये काय बदल झाले आहेत ?
गेल्या काही वर्षांत खूप सकारात्मक बदल झाले आहेत. पूर्वी अनेक चित्रपटांमध्ये आई, बहीण किंवा पत्नी ही फक्त नायकाला पुढे नेण्यासाठी असलेली पात्रं असायची. त्यांना नाव, इतिहास किंवा स्वतंत्र अस्तित्व नसायचं. आज परिस्थिती बदलली आहे. आता महिला पात्रांना स्पष्ट व्यक्तिमत्त्व, संघर्ष आणि स्वतंत्र प्रवास दिला जातो. स्त्री व्यक्तिरेखांना आता स्वतंत्र अस्तित्व मिळतंय. ओटीटीमुळेही हा बदल वेगानं झाला. मात्र कॅमेऱ्यासमोर जसा बदल दिसतोय, तसा कॅमेऱ्यामागेही अजून व्हायला हवाय. दिग्दर्शक, छायाचित्रकार यांसारख्या क्षेत्रांत अधिकाधिक महिला आल्या, तर चित्र आणखी सकारात्मक असेल.
सीरिजमध्ये तुम्ही साकारत असलेल्या आईच्या मनातील असुरक्षितता हळूहळू उलगड जाते… त्याविषयी काय सांगाल ?
सुरुवातीला जानकीला मुलगी सासरी छान रुळतेय, याचं कौतुक वाटतं. पण हळूहळू तिला जाणवतं, की मुलगी अनेक गोष्टींसाठी सासूबाईंचा सल्ला घेते, त्यांचं ऐकते. मग एक क्षण असा येतो, की ती स्वतःला विचारते, ‘माझं स्थान आता नेमकं कुठे आहे?’ ही ईर्ष्या नकारात्मक नाही, तर एका आईच्या मनातील नैसर्गिक भावनिक प्रतिक्रिया आहे. त्यात तिच्या आयुष्यातील निवृत्तीचा टप्पाही जवळ आलेला असतो. त्यामुळे आईपण आणि व्यावसायिक आयुष्य या दोन्ही ठिकाणी बदल अनुभवणाऱ्या स्त्रीची ही अवस्था आहे. या कलाकृतीतील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे दोन आयांचं नातं. सुरुवातीला थोडी स्पर्धा, गैरसमज किंवा असुरक्षितता असली, तरी नंतर एक समतोल निर्माण होतो. मुलीच्या आयुष्यात दोघींचीही वेगवेगळी जागा असते. एक आई जन्म देणारी असते, तर दुसरी तिच्या नव्या आयुष्याची साथ देणारी असते. दिग्दर्शक वरुणनं हा समतोल अतिशय संवेदनशीलपणे हाताळला आहे. त्यामुळे ही कथा केवळ सासू-सुनेची राहत नाही, तर दोन आयांच्या मैत्रीची कथा बनते.
माझी गुणी हृता !
हृतासोबत काम करण्याचा अनुभव समृद्ध करणारा ठरला. पडद्यावरचं आई-मुलीचं नातं अधिक जिवंत आणि खरं वाटावं यासाठी ती प्रत्येक सीनपूर्वी आवर्जून चर्चा करायची, नव्या कल्पना मांडायची आणि पात्राचा अधिक खोलवर विचार करायची. तिच्यातील ही शोधक वृत्ती मला विशेष भावली. ऋतामध्ये अफाट ऊर्जा, कामाबद्दलची प्रामाणिकता आणि सतत शिकत राहण्याची भूक आहे. एखाद्या दृश्यात केवळ संवाद बोलून पुढे जाण्यापेक्षा त्या प्रसंगामागची भावना समजून घेण्याचा तिचा प्रयत्न असतो. त्यामुळे तिच्यासोबत काम करताना तिचं व्यक्तिमत्त्व अधिक जवळून अनुभवता आलं. नव्या पिढीतील एखादी कलाकार इतक्या उत्कटतेनं आणि उत्साहानं काम करताना दिसली, की नवी प्रेरणा मिळते. ऋताची हीच जिद्द आणि तिचं समर्पण तिला वेगळं ठरवतं.
Aga Aai Aho Aai Cast Mata Katta : ‘अगं आई अहो आई’ वेबसिरीजमधील कलाकारांशी गप्पा
करोनानंतर प्रेक्षकांच्या कलाकृती पाहण्याच्या सवयी बदलल्या आहेत. अॅक्शन, हॉरर, फँटसी किंवा भव्य दृश्यरचना याकडे त्यांचा कल वाढला आहे. नातेसंबंधांवर आधारित, वास्तववादी कथा ते घरी बसून ओटीटीवर पाहणं पसंत करतात. कारण अशा कथा त्यांच्या जवळच्या असतात

