Headlines

Manoj Jarange Patil Slams Dhananjay Munde


मनोज जरांगे पाटील यांनी पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली.

Manoj Jarange Patil
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
बीड : भाजप नेत्या तथा मंत्री पंकजा मुंडे यांनी एका कार्यक्रमात राजकारणातून रिटायर्ड व्हावं असं वाटत असल्याचं म्हटलं. पण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून उभारी येते, असंदेखील त्यांनी नंतर म्हटलं. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा होत आहे. त्यांच्या या वक्तव्याबाबत मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर घणाघात केला.

“पंकजा मुंडे रिटायर झाल्या तर हा (धनंजय मुंडे) सगळ्या दुनियेत धिंगाणा घालेल. वारसाच मोडला मग. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे साहेबांचा वारसा चालवण्याची हिंमत पंकजा मुंडेंकडे आहे. खूप गरिबीतली जात त्यांनी वर काढलेली आहे आणि या जर बाजूला गेल्या तर ती जात पूर्ण जेलमध्ये घालेल हा, गोरगरिबांना अन्नापासून वंचित करेल हा”, असा घणाघात मनोज जरांगे यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर केला.

जरांगेंचा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप

“यापुढे मराठ्यांच्या नादी लागायचं नाही. मराठ्यांसोबत मारामारी बंद. नाहीतर मी पठ्ठ्या आहे. दोन-तीन वेळा तुला वाचवले आहे. नाहीतर तुला मध्ये घालीन. माझ्या खुनाच्या कटात शंभर टक्के तू आहेस. मात्र तुला वाचवलेले आहे”, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला.

“माझ्या घातपाताच्या प्रकरणात तू आहेस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शुक्ला यांना घेऊन बसलास. तिथे तुला वाचवले, तो सगळा डाटा फडणवीसांकडे आहे. तो कधी पण बाहेर येऊ शकतो, हे मी जबाबदारीने बोलत आहे”, असा दावा जरांगे यांनी केला.

“तू पाप करायचं बंद केलं आणि मराठ्यांना त्रास देणं बंद केलं तर काहीतरी होईल. नाहीतर तुझे वाईट दिवस येणार. चांगले दिवस येणार नाहीत”, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली.

जरांगेंची धनंजय मुंडेंवर सडकून टीका

“कायदा सुव्यवस्था म्हटलं की आपलंच लफडं आहे हे त्याला कळलं. पत्रकारांना बोलू देत नाही याचा अर्थ म्होरक्याच तो आहे. बीड जिल्ह्यातली कायदा सुव्यवस्था बिघडवणारा म्होरक्याच तो आहे. मराठा आणि ओबीसीमधलं प्रेम तोडायला धन्या कारणीभूत. तू कितीही खळ्या खंदल्या तरी तुला माती काढू देत नाही”, अशी खोचक टीका जरांगेंनी केली.

“महादेव मुंडे प्रकरणातील आरोपींना मध्ये टाक असं म्हणायला पाहिजे. तिथं तोंड उचलत नाही. खून करणारे, चोरी करणारे, खंडणी मागणाऱ्यांचं समर्थन करायला लागला म्हणून धन्या संपला”, अशी टीका देखील जरांगेंनी केली.

“जातीपातीचं राजकारण यानेच आणलं, सगळ्याच जातीपातीच्या लोकांचा कार्यक्रम केला. बलात्कार करणाऱ्याला सांभाळावं लागेल, असं म्हणतो. आता तू पश्चाताप करायला लागला. तुला उशिरा का होईना शहाणपण आलं. बरं झालं. तुझ्यामुळे बहिणीला सुद्धा भोगावं लागतंय. फक्त तुझ्यामुळे”, असादेखील घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“जेव्हा काळ होता तेव्हा नीट खाता आलं नाही. मराठ्यांसह सगळ्या जातींनी मोठं केलं आणि टोळीने ओरबाडून खाल्लं. ना ओबीसी मोठा होऊ दिला, ना मराठा मोठा होऊ दिला, मारामारीत वेळ जास्त घातला. तू शहाणा हो. मराठ्यांच्या नादी लागू नको. कोणताही पक्ष, कोणीही तुला जवळ करणार नाहीत. काळ यायचा, काळ गेला. आता मध्ये जायची वेळ आली आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.