Headlines

Devendra Fadnavis Tiranga Yatra Sambhajinagar :देश बदलतोय, राज्य बदलतंय ; राज्याची अर्थव्यवस्था ५० लाख कोटींच्या घरात


Tiranga Yatra: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह सगळीकडे दिसून येत असताना स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करण्यासाठी तिरंग्याप्रती असलेल प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांना संबोधित केली.

तिरंगा यात्रा
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर: राज्याची अर्थव्यवस्था २०१३-१४ मध्ये १२ ते १३ लाख कोटी रुपये होती. जी वाढून आता सुमारे ५० लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. आपला देश बदलत आहे, मराठवाडा देखील परिवर्तनाच्या लाटेवर असून दुष्काळमुक्तीकडे वाटचाल सुरु झाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.

तिरंगा यात्रा

‘स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रभक्तीची भावना अधिक दृढ करणे, राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचविणे; तसेच राष्ट्रध्वज तिरंग्याप्रति असलेला अभिमान, सन्मान आणि आदर व्यक्त करण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी तिरंगा यात्रा काढण्यात आली. यात्रा क्रांती चौकात पोहोचल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी ते बोलत होते.

भाजप पदाधिकाऱ्यांसह युवावर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित

याप्रसंगी विधानसभेचे सभापती प्रा. राम शिंदे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, खासदार अशोक चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, रावसाहेब दानवे यांच्यासह लोकप्रतिनिधी, भाजप पदाधिकाऱ्यांसह युवावर्ग, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती संभाजीनगराने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मागे टाकले

याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुंबई, पुणे येथे तिरंगा यात्रेला प्रचंड गर्दी होती, परंतु छत्रपती संभाजीनगराने गर्दीचे सर्व रेकॉर्ड मागे टाकले. ही गर्दी पाहता देवगिरी किल्ल्यावरील सर्व सेना क्रांती चौकात उतरल्याचे दिसते. आपला राष्ट्रध्वज – तिरंगा हा आपली आनबान आणि शान आहे. ह्या तिरंग्यासाठी हजारो लोकांनी बलिदान दिले. हा तिरंगाहीच आपली खरी ओळख आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी संदेश दिला, ९ ते १५ ऑगस्टपर्यंत तिरंगा यात्रा काढून देशप्रेमाने ओतप्रोत मातृभूमीचे दर्शन घडवू. त्यानुसार आज हा जनसमुदाय तिरंग्याच्या प्रेमासाठी एकत्र आला आहे.

देश बदलतोय, राज्य बदलतंय

फडणवीस पुढे म्हणाले की, जगात बलशाली देश म्हणून भारताची ओळख निर्माण झाली. जगात चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून स्थान निर्माण केले. राज्याची अर्थव्यवस्था २०१३-१४ मध्ये १२ ते १३ लाख कोटी रुपये होती. जी वाढून आता सुमारे ५० लाख कोटींच्या घरात पोहोचली आहे. देश बदलतोय, राज्य बदलतंय, मराठवाड्यातही परिवर्तन होत आहे.

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही.

या पिढीने दुष्काळ पाहिला. आमचा संकल्प आहे मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही. कोकणातून समुद्रात वाहून जाणारे पाणी उजनीमार्गे मराठवाड्यात आणून इथला भाग सुजलाम सुफलाम करू.आपण तिसरी स्टार्ट अप इको सिस्टीम तयार केली. त्यात तरुणाईचे योगदान मोठे आहे. नव संशोधनात तरुणाई अग्रेसर आहे. त्याबळावरच आपला भारत विकसित भारत म्हणून वाटचाल करीत आहे,असे त्यांनी नमूद केले.

Maharashtra TimesPresident Medal: पुण्यातील कदम, स्वामी यांना राष्ट्रपती पदक; कदम CID, स्वामी पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात सेवेत

देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले.

मराठवाड्याला देशापेक्षा १३ महिने उशिरा स्वातंत्र्य मिळाले. निजामाच्या राजवटीतून मोकळा श्वास घेण्यासाठी हजारो देशभक्तांनी बलिदान दिले. त्यांचे स्मरण आपण करू. आज आपण एक प्रतिज्ञा करू. आपल्या देशासाठी,राज्यासाठी समाजासाठी जगू, देशासाठी गरज पडली तर मरायला तयार राहू, असे त्यांनी नमूद केले. सभास्थानी प्रारंभी वंदे मातरम्, राज्यगीत झाले व राष्ट्रगीताने सभेचा समारोप झाला.

Maharashtra TimesNashik FDA Raid: नाशिकमध्ये Zeptoवर एफडीएची कारवाई! अन्न परवाना निलंबित, तपासणीत स्वच्छता-आरोग्यविषयक निकषांचं उल्लंघन

राजकीय नेतृत्वात हिंमत नव्हती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दशकात देशाला प्रगतीपथावर नेले. २०१४ पूर्वी भारताला एक कमजोर देश म्हणून बघितले जात होते. दहशतवादी स्फोट घडवून निघून जात. आपल्या सैनिकांमध्ये ताकद होती, परंतु तत्कालीन राजकीय नेतृत्वात हिंमत नव्हती. २०१४ मध्ये पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी सांगितले, की खबरदार आमच्या देशाकडे वाकडी नजर केली, तर घुसकर मारेंगे…आणि आपल्या सैनिकांनी शत्रूंना त्यांच्या घरात घुसून मारले, असे फडणवीस यांनी सांगितले.

कांचन परुळेकर

लेखकाबद्दलकांचन परुळेकरकांचन परुळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कन्सलटंट पदावर कार्यरत आहेत. कांचन स्थानिक बातम्या, पायाभूत सुविधा, बांधकाम आणि विकास प्रकल्प यासाठी लिखाण करतात. त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात ही महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमधून झाली. मार्च २०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्सच्या व्हिडिओ विभागात त्यांनी इंटर्न म्हणून काम केले. सुरुवातीला त्यांनी युट्यूब, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी कन्टेंट तयार करताना व्हिडिओ आणि लेख लिहिले आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, स्थानिक बातम्या आणि क्राइमसह स्पोर्ट्सवर इत्यादी विषयांचे वाचन आणि लेखन करण्याची त्यांना विशेष आवड आहे.

कांचन यांचे संपूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून झाले असून पत्रकारितेची आवड असल्याने त्यांनी कोकण ते मुंबई असा शैक्षणिक प्रवास केला. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण गावी पूर्ण केले. इकोनॉमिक्स या विषयातून पद्वी घेतली. लिखाणाची आवड, संवाद साधण्याचे कौशल्य आणि पत्रकारितेची आवड समजून घेऊन साठ्ये कॉलेज विलेपार्ले येथे वृत्तपत्रविद्या आणि संवाद या विषयात त्यांनी पद्व्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतला.

महाविद्यालयीन काळात कला आणि नाटक विषयात विशेष आवड असल्याने त्यांनी अभिनयदेखील केले आहे. काही नाटक त्यांनी लिहिले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्ये त्यांना अभिनयासाठी ब्रॉन्झ आणि सिल्व्हर मेडल देण्यात आले आहेत. कविता आणि लेख लिहिण्याची आवड असल्याने शाळा ,कॉलेज मासिक अंकात त्यांचे लेख देखील प्रसिध्द झाले आहेत.

२०२६ मध्ये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन सोबत जोडल्या गेल्यानंतर त्यांची पत्रकारितेची आवड अगदी स्पष्ट झाली. बोलण्यातला स्पष्टपणा लिखाणातली पारदर्शकता अधिक नव्याने समजत गेली. तीन महिन्यांच्या इंटर्नशिप नंतर त्या आता कन्सलटंट पदावर म.टा. समुहात सहभागी झाल्या आहेत. पारदर्शकता आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहचवण्याचं काम त्या करत आहेत.आणखी वाचा