राज्यभरातल्या प्रेक्षकांनी पहिल्या चित्रपटाला भरून प्रेम दिलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. ‘देऊळ बंद २‘ हा फक्त पहिला चित्रपट नाही, तर माझ्या अनेक वर्षांच्या स्वप्नांच्या प्रवासाची सुरुवात आहे. या सिनेमाचा भाग होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो. मी साकारलेल्या दत्ता पायगुडे या शेतकरी तरुणाची भूमिका प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली. चित्रपटसृष्टीची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या माझ्यासारख्या नवोदित कलाकारासाठी यापेक्षा मोठं समाधान नाही. या यशामुळे आनंद आहेच; पण त्याचबरोबर जबाबदारीही अनेक पटींनी वाढली आहे.
ही भूमिका कशी मिळाली ?
मी नोकरी सांभाळून अनेक वर्षं नाटकांमध्ये काम करत होतो. त्याच काळात प्रवीण तरडे सरांनी माझं नाटकातलं काम पाहिलं होतं. पुढं त्यांचं सहकार्य आणि विश्वासामुळे मला ‘लाखात एक आमचा दादा’ या मालिकेत काम करण्याची संधी मिळाली. पुढे ‘शुभ श्रावणी’ मालिकेत मॅडी ही भूमिका साकारली. या प्रवासात प्रवीण सरांच्या टीममधून कास्टिंग डायरेक्टर विनोद वनवेंचा फोन आला. त्यांनी मला ऑडिशन पाठवायला सांगितलं. दत्ता या पात्रासाठी स्पर्धेत ताकदीचे कलाकार होते; पण माझी ऑडिशन त्यांना आवडली आणि माझी निवड झाली.
प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांच्याविषयी काय सांगाल ?
प्रवीण सरांसोबत काम करणं म्हणजे विद्यापीठात प्रवेश घेण्यासारखा अनुभव आहे. ते सेटवर असले, की ऊर्जा आणि शिस्त जाणवते. सिनेमातल्या एका प्रसंगात मला भर गावासमोर प्रवीण सरांच्या पात्राशी उर्मट आवाजात बोलायचं होतं. चित्रीकरण सुरू होण्याआधी ते माझ्याजवळ आले आणि म्हणाले, ‘या सीनमध्ये मी तुझा दिग्दर्शक नसून, सहकलाकार आहे. दडपण घेऊ नकोस. तोडीस तोड अभिनय कर.’ मी प्रसंगी त्यांचा ओरडाही खाल्ला; पण ते प्रोजेक्टच्या भल्यासाठी असतं. स्नेहल वहिनी अतिशय अभ्यासू आणि संवेदनशील आहेत. त्या स्वतःसह इतर पात्रांचं काम चांगलं व्हावं, याचाही विचार करतात. दोघांकडून खूप शिकायला मिळालं; जे आयुष्यभर उपयोगी पडेल.
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वामी समर्थांचं माध्यम, देऊळ बंद २ सिनेमाच्या टीमसोबत गप्पा
वेगळ्या क्षेत्रातून मनोरंजनसृष्टीत येताना काय संघर्ष करावा लागला ?
मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम करत होतो. नोकरी सांभाळून अभिनयाचं स्वप्न जिवंत ठेवणं सोपं नव्हतं. चाकोरीबद्ध जीवनातून वेळ काढणं, प्रायोगिक नाटकांच्या तालमी, ऑडिशन, चित्रीकरण, अनेकदा नकार पचवणं सुरू होतं. नऊ ते सहा नोकरी करून कसाबसा साडेसहापर्यंत तालमीला पोहचून रात्री ११-१२ वाजेपर्यंत किंवा कधी रात्रभर तालीम करून पुन्हा सकाळी ऑफिस असे. राज्यनाट्य, कामगार कल्याण, दाजीकाका गाडगीळ करंडक आणि प्रयोग हे सगळं होत असत. अभिनेता होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्या पायरीपर्यंत पोहचू शकलो, हे महत्त्वाचं!

