Headlines

Crime News: राज्यात टॉपर, CM कडून सन्मान; आता सगळ्या पदव्या रद्द, 1 लाखाचं बक्षीस, टॅबलेटही जप्त होणार


बारावीत राज्यात पहिला आलेल्या मुलाचा मुख्यमंत्र्यांनी सन्मान केला. पण शेजाऱ्याच्या चाणाक्षपणामुळे आता त्याच्या पदव्या रद्द झाल्या आहेत. त्याला दिलेलं १ लाखाचं बक्षीसही जप्त होणार आहे.

rajnish yadav
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
लखनऊ: संस्कृत बोर्डाच्या बारावी परिक्षेतील टॉपर रजनीश यादवच्या सगळ्या पदव्या रद्द करण्यात आल्या आहेत. अव्वल आल्यानं १ लाख रुपये देऊन त्याचा सन्मान करण्यात आला. ती रक्कमदेखील आता परत घेतली जाणार आहे. उत्तर प्रदेशच्या प्रतापगढमधील आसपूर देवसरा येथील रहिवासी असलेला रजनीशनं संस्कृत बोर्डच्या बारावीच्या परिक्षेत अव्वल क्रमांक पटकावला होता. त्यानंतर त्याला १ लाख रुपयांचं बक्षीस, टॅबलेट, पदवी आणि प्रशस्तीपत्र देण्यात आलं होतं.

रजनीशचा शेजारी जगत प्रसादनं तक्रार दाखल केली. या तक्रारीची चौकशी करण्यात आली. त्यात त्याची जुनी शैक्षणिक कागदपत्रं बोगस आढळून आली. रजनीशनं जन्मतारखेसह नावातही बदल केला होता. त्यामुळे प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेचे संचालक प्रताप सिंह बघेल यांनी त्याचे हायस्कूल आणि इंटरमीडिएटची शैक्षणिक कागदपत्रं रद्द केली. रजनीशला देण्यात आलेला पुरस्कार परत घेतला जाणार असून त्याला दिलेला सन्मान निधीही वसूल केला जाणार आहे.

यूपी संस्कृत बोर्ड २०२६ चा टॉपर रजनीश यादवच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. यादव विरोधात फसवणूक, कटकारस्थान रचल्याच्या गंभीर कलमांच्या अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. सरकारनं आता त्याच्याकडून लॅपटॉप आणि १ लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. नाव आणि जन्मतारखेत बदल करून प्रवेश घेऊन परीक्षा दिल्याचा आरोप रजनीशवर आहे.

रजनीशचा शेजारी जगत प्रसादनं दिलेल्या तक्रारीच्या आधारे आसपूर देवसरा पोलीस ठाण्यानं कारवाई केली. राम टहल संस्कृत माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या रजनीशनं २४ एप्रिलला जाहीर झालेल्या निकालात ८९.३६ टक्के मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकावला. यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचा सन्मान केला होता. आता हाच टॉपर कायदेशीर वादात सापडला आहे.

या सगळ्या घटनाक्रमानंतर उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षण परिषदेच्या २०२६ मध्ये बारावीच्या परिक्षेत राज्यात पहिला क्रमांक मिळवणाऱ्या रजनीश यादवचं नाव वादात सापडलं आहे. शेतकरी कुटुंबातून आलेल्या रजनीशनची संघर्षगाथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली होती. मात्र आता त्याच्यावर फसवणुकीचे आरोप झाले आहेत.