चीन हा भारताचा मोठा शेजारी देश. हा देश लवकरच महासत्ता होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चीनच्या राजकारण व अर्थकारणाचा मोठा अभ्यास भारतात होणे आवश्यक आहे. अलीकडच्या संघर्षानंतर भारतातील थिंकटँक आता चीनवर विशेष अभ्यास करू लागले आहेत. पण या विषयावर खूप आधीपासून भाष्य करणाऱ्या तज्ज्ञांपैकी एक आहेत विजय गोखले. ते भारताचे परराष्ट्र सचिव होते. शिवाय ते चीनमध्ये राजदूतही होते. त्यांनी चीनवर अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यातील ताजे पुस्तक म्हणजे ‘चायनाज वॉर्स : द पॉलिटिक्स अँड डिप्लोमसी बिहाइंड इट्स मिलिटरी कोअर्शन’. चीनने कोरिया, भारत, व्हिएतनाम , सोव्हिएत रशिया यांच्याशी केलेली युद्धे, तसेच तैवानवरील दबाव यांवरून चीनच्या युद्धनीतीचे तंत्र समजावण्याचा तर्कशुद्ध प्रयत्न या पुस्तकातून केला आहे.
गोखले यांच्या मते, चीन शक्यतो युद्ध टाळतो. केवळ युद्धाची जबर भीती, म्हणजे कोअर्शन, दाखवूनच आपले राजकीय उद्दिष्ट साधण्याचा हेतू असतो. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी वरील चारही युद्धे व तैवानविरुद्धच्या लष्करी कवायतींचे दाखले दिले आहेत. चीन नेहमीच प्रतिस्पर्ध्याला आक्रमक ठरवतो व आपण फक्त बचावात्मक पवित्रा घेतला आहे, असे जगाला भासवतो. त्यासाठी युद्धाचे खूप आधीपासून तपशीलवार नियोजन केले जाते. त्यासाठी योग्य अशी राजकीय पार्श्वभूमी तयार केली जाते. युद्ध फार लांबवण्यावर चीनचा विश्वास नाही. ते झटपट आटोपून प्रतिस्पर्ध्याला वाटाघाटीच्या टेबलावर ओढायचे व दबाव टाकून आपले राजकीय उद्दिष्ट साध्य करायचे, अशी चीनची नीती असते.
चीन हा एकपक्षीय हुकूमशाही असलेला देश आहे. त्यामुळे तेथील राज्यकर्ते जनअसंतोषाला नेहमीच घाबरत असतात. तो दडपून जनतेचे मोहोळ अंगावर घेण्यापेक्षा लोकांमधील राष्ट्रवाद जागा करून त्यांचे लक्ष अन्यत्र वळवण्यासाठीही चीन युद्धाचा आधार घेण्यास कचरत नाही, असेही निरीक्षण गोखले यांनी मांडले आहे.
भारताने यापुढच्या काळात चीनविषयी काय सावधगिरी बाळगावी, याचेही अत्यंत मोलाचे विवेचन गोखले यांनी या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात केले आहे. कारण चीन आणि भारत यांच्यातला वाद आता फक्त हिमालयातील सीमेपुरता मर्यादित राहिलेला नाही. तो आता दक्षिण चीन सागरातून हिंदी महासागरात सरकत आहे. येत्या दहा वर्षांत चीन मोठ्या शक्तीनिशी हिंदी महासागरात उतरून भारताला आव्हान देण्याची शक्यता आहे.
अमेरिकेच्या भूराजनीतीला भारताचा किती हातभार असणार आहे, याचा विचार चिनी राजनीतिज्ञ करीत असतात. भारत अमेरिकेच्या जवळ जात असला की चीन राज्यकर्त्यांत अस्वस्थता निर्माण होते. भारताने असे काही साहस करू नये, यासाठी चीनने भारताला घेरण्याची नीती अवलंबिली आहे. अलीकडे भारताने चीनचा हा चक्रव्यूह भेदण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. भारताने फिलिपिन्स, इंडोनेशिया, व्हिएतनाम यांच्याशी संरक्षण संबंध वाढवले आहेत. त्यामागची प्रेरणा गोखले यांच्या या विश्लेषणात दिसते.
तिबेटच्या प्रश्नाबाबत भारताच्या धोरणातील संदिग्धताही चीनला अस्वस्थ करते. त्यामुळे येत्या काळात भारताबरोबर चीनचे ‘ग्रे वॉरफेअर’, म्हणजे छुपे युद्ध, चालू राहील, असे गोखले यांचे मत आहे. अशा छुप्या युद्धात सीमेवर लष्करी जमवाजमव, भारताविरुद्ध प्रचारतंत्र, पाकिस्तानी कारवायांना केवळ पाठिंबाच नाही, तर उघड मदत अशा गोष्टींचा समावेश असेल. त्यामुळे भारताला चीनशी दीर्घकाळ लष्करी सहअस्तित्व ठेवण्याची तयारी करावी लागेल.
शांततापूर्ण सहजीवनाचा काळ आता संपला आहे. त्यामुळे येत्या काळात भारताला आपले लष्करी बळ, आर्थिक शक्ती व राजकीय मुत्सद्देगिरी पणाला लावावी लागेल. तसे केले तरच सीमेवरील स्थिती जैसे थे राहू शकेल; अन्यथा चीन ही परिस्थिती कधीही बदलू शकेल. अर्थात, यात सर्वाधिक अनुभव असलेला भारत योग्य नीतीचा अवलंब करून चीनला तोंड देऊ शकेल, असा विश्वास लेखकाला वाटतो. भारतातील अभ्यासकांनी आवर्जून वाचावे, असे हे पुस्तक तर आहेच; पण जागतिक धोरणतज्ज्ञांनाही ते डावलून पुढे जाता येणार नाही.
————————————-
चायनाज वॉर्स :
द पॉलिटिक्स अँड डिप्लोमसी
बिहाइंड इट्स मिलिटरी कोअर्शन
लेखक : विजय गोखले
प्रकाशक : सायमन अँड शुस्टर
पाने : १७४ किंमत : ६९९ रु

