रायगड – राज्यात सध्या मुसळधार पावसाने धुमाकुळ घातला आहे.. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे आंबेनळी घाटात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. बावळी टोक परिसरात डोंगरावरील मोठे दगड थेट रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून, घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या आंबेनळी घाटातील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे.. या कामासाठी काही ठिकाणी डोंगर कापण्यात आल्याने सततच्या पावसात माती व दगड सैल होऊन दरडी कोसळण्याचे प्रकार वाढल्याचे दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी पायटा ते कुंभळवणे दरम्यानही दगड कोसळल्याची घटना घडली होती.
त्यानंतर आता बावळी टोक परिसरात पुन्हा दरड कोसळल्याने प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलादपूर प्रशासनाने नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय आंबेनळी घाटमार्गाचा वापर करू नये, तसेच घाटातून प्रवास करताना वाहनाचा वेग नियंत्रित ठेवून अधिक काळजी घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि दरडी कोसळण्याच्या घटना वाढल्यास सुरक्षेच्या दृष्टीने घाटमार्ग तात्पुरता बंद करण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो.
