![]()
रक्षाबंधनाच्या निमित्ताने वर्ध्यात माणुसकीच्या नात्याचा सुंदर धागा पाहायला मिळाला. अल्पसंख्याक समाजातील महिलांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या हातावर राखी बांधत धर्मापेक्षा माणुसकी मोठी असल्याचा संदेश दिला. विशेष म्हणजे, यातील अनेक महिलांनी आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या व्यक्तीला राखी बांधली. त्यामुळे हा क्षण त्यांच्यासाठीही भावनिक आणि अविस्मरणीय ठरला.
नाजिया धामिया यांच्या पुढाकारातून मुख्यमार्गावरील ठाकरे मार्केट येथील फनाश्क बुटीकमध्ये या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महिलांनी पालकमंत्री डॉ. भोयर यांचे औक्षण करून प्रेमाने त्यांच्या मनगटावर राखी बांधली. यावेळी त्यांच्या पत्नी ॲड शितलताई भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.
राखीचा धागा छोटा असला तरी त्यातून निर्माण होणारे नाते मोठे असते. प्रेम, विश्वास, आपुलकी आणि संरक्षणाच्या भावनेला धर्माची चौकट नसते, हे या उपक्रमातून अधोरेखित झाले. राखी बांधताना महिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान पाहण्यासारखे होते.विविधतेतून एकता आणि परस्पर सन्मानाची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. एका राखीच्या धाग्याने सामाजिक सलोख्याचा संदेश देत रक्षाबंधनाला वेगळीच किनार दिल्याने या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
Source link
पहिल्यांदाच राखी बांधली, चेहऱ्यावर आनंद फुलला:अल्पसंख्याक महिलांचा पालकमंत्री भोयरांसोबत अनोखा रक्षाबंधन सोहळा
