पाटणा : 70 वी बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी बिहारची राजधानी पाटणा येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. गांधी मैदानातून राजभवनाच्या दिशेने मोर्चा काढणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. यावेळी आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्स तोडल्याने परिस्थिती चिघळली. पोलिसांनी आंदोलकांवर पाण्याचा मारा केल्यानंतर लाठीचार्जही केला.
विद्यार्थी मुख्यमंत्री निवासाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करत असल्याने पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. आंदोलकांनी बॅरिकेड्स हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखले. या कारवाईदरम्यान काही माजी विद्यार्थी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
‘मुख्यमंत्री आमची क्रांती रोखू शकत नाहीत’
आंदोलनात सहभागी एका विद्यार्थिनीने मुख्यमंत्री निवासाला घेराव घालण्यासाठी जात असल्याचे सांगितले. “आम्हाला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र आमची क्रांती रोखण्याची ताकद त्यांच्यात नाही,” अशी प्रतिक्रिया तिने दिली. यावेळी तिने आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
‘विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न’
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या एका माजी विद्यार्थी नेत्या महिलेने सरकारवर गंभीर आरोप केले. बीपीएससीशी संबंधित आंदोलनादरम्यान यापूर्वीही आपल्याला तुरुंगात पाठविण्यात आल्याचा दावा तिने केला. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी आपण सातत्याने आवाज उठवत असल्याचे सांगत सरकारकडून आपल्याला लक्ष्य केले जात असल्याचा आरोपही तिने केला.
नियम बदलल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप
आंदोलनातील आणखी एका विद्यार्थ्याने कागदपत्र पडताळणीनंतर नियमांमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप केला. भरती प्रक्रियेच्या सुरुवातीलाच नियमांबाबत स्पष्ट अधिसूचना जारी करणे आवश्यक होते. मात्र कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर नियम बदलण्यात आले आणि त्यानंतर उमेदवारांना प्रक्रियेतून बाहेर करण्यात आल्याचे त्याने म्हटले.
काँग्रेसकडून सरकारशी चर्चेची मागणी
काँग्रेसचे सुशील कुमार यांनीही विद्यार्थ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत सरकारने आंदोलकांशी चर्चा करावी, अशी मागणी केली. TRE 4.0 साठी कोणत्याही परिस्थितीत एकस्तरीय परीक्षा लागू करावी आणि नकारात्मक गुणांकनाची पद्धत रद्द करावी, अशी मागणी त्यांनी केली. बीपीएससी, बीएसएससी आणि उपनिरीक्षक भरतीशी संबंधित अनेक प्रश्न प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थी मागील 9 दिवसांपासून उपोषण करत असतानाही सरकारकडून त्यांच्याशी चर्चा केली जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारने वेळेत चर्चा केली असती, तर सध्याची परिस्थिती निर्माण झाली नसती, असेही त्यांनी म्हटले.
‘प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू देणार नाही’
मोर्चापूर्वी डीएसपी कामाख्या नारायण सिंह यांनी आंदोलकांना प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करू दिला जाणार नसल्याचे स्पष्ट केले होते. विद्यार्थ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर अनेक प्रश्न मांडले असून त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे विद्यार्थी माघार घेतील, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच, आंदोलकांनी ऐकले नाही तर त्यांना पुढे जाऊ दिले जाणार नाही, असा इशाराही पोलिसांनी दिला.
70 वी बीपीएससी परीक्षा रद्द करण्याच्या मागणीवरून सुरू झालेले हे आंदोलन आता अधिक तीव्र झाले असून, विद्यार्थी आणि सरकार यांच्यातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
